सोलापूर : शहरातील अंदाजे पाच हजार ऑटो रिक्षा चालकांना त्यांची रिक्षा स्क्रॅप करण्याऐवजी सीएनजी किंवा एलपीजी इंधन वापर रूपांतरामुळे वापरता येणार आहे. परिवहन खात्याच्या या आदेशाने रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे.
परिवहन खात्याने सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांना सीएनजी किंवा एलपीजी इंधन वापराच्या रिक्षामध्ये रूपांतर केल्यास स्क्रॅपच्या कालावधीत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रिक्षाचालकांना त्यामुळे आणखी पाच ते १० वर्षे रिक्षा वापरण्याची संधी मिळाली आहे. केवळ इंधन वापराचे तांत्रिक रूपांतर करण्याचा खर्च करून हे शक्य होणार आहे.
काही वर्षात पेट्रोलच्या जादा दरामुळे रिक्षा चालकांना देखील आर्थिक नुकसान होत होते. पण स्क्रॅपची मुदत १५ वर्षाची असल्याने आहे त्या स्थितीत रिक्षा चालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.
इंधन वापराचे रूपांतर केले तरी स्क्रॅपच्या मुदतीत रिक्षा बंद करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्यातच नवीन रिक्षा खरेदीच्या बाबतीत देखील अडचणी होत्या. वाहन कर्जाचे मोठे व्याजदर, विमा संरक्षणाचा मोठा खर्च यामुळे रिक्षा चालक मेटाकुटीस आलेले आहेत. मात्र आता सीएनजी किंवा एलपीजी इंधन वापराच्या रूपांतराने मात्र काही वर्षासाठी त्यांना त्यांची जुनी रिक्षा आणखी काही काळ वापरता येणार आहे.
अंदाजे ५ हजार स्क्रॅप स्थितीजवळ आलेल्या रिक्षांना लाभ
काही वर्षात एलपीजी इंधन वापरात रूपांतरीत झालेल्या ४ हजार रिक्षा
सीएनजी इंधन वापरात रूपांतरीत झालेल्या रिक्षा- ३ हजार
एलपीजी रूपांतरीत रिक्षांना स्क्रॅपसाठी ५ वर्षांची मुदतवाढ
सीएनजी रूपांतरीत रिक्षांना स्क्रॅपसाठी १० वर्षांची मुदतवाढ
इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या ऑटोरिक्षा सध्या रस्त्यावर येत आहेत. पण बॅटरी संबंधित काही अडचणी चालकांसमोर आहेत. बॅटरीची वॉरंटी मिळाली तरी नंतर लिथियम बॅटरी मिळण्याबाबत चालकांना चिंता वाटत आहे. तसेच इतर बॅटरीचे प्रकार वापरले तर वाहनासाठी ते नेमके किती काळ टिकेल याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे या संदर्भात उत्पादकांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाची गरज भासते आहे.
पेट्रोलच्या रिक्षांचे सीएनजी रूपांतर करण्यासाठी केवळ आठ हजारांचा खर्च येतो तर एलपीजी करण्यासाठी १५ हजारांचा खर्च येतो. त्यामुळे नवीन रिक्षा घेण्यापेक्षा हे रूपांतर करून आणखी काही वर्षे रिक्षाचालक तीच रिक्षा वापरू शकतात.
स्क्रॅप होणाऱ्या रिक्षा चालकांना नव्या आदेशाचा लाभ होणार आहे. शहरातील अंदाजे ५ हजार चालकांना त्याचा लाभ होऊ शकेल. निदान त्यांचा नवीन रिक्षा घेण्याचा खर्च काही वर्षासाठी टाळला जाऊ शकेल. हे आदेश रिक्षाचालकांना फायद्याचे ठरणार आहेत.
- सलीम मुल्ला, पदाधिकारी, लाल बावटा संघटना, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.