आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेऊन पोलीस उपअधीक्षक झालेले सचिन कदम

जगातील सर्व यशस्वी लोकांना पाहिले तर त्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची महत्वाची भूमिका
Deputy Superintendent of Police
Deputy Superintendent of Policesakal

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : जगातील कोणताही व्यक्ती वडिलांचा संयम आणि आईच्या प्रेमाची तुलना करू शकत नाही. जर आपण या जगातील सर्व यशस्वी लोकांना पाहिले तर त्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या पालकांकडून प्रेरणा घेऊन आणि त्यांचे आदर्श अनुसरण केल्यावरच ते त्यांच्या जीवनातील यशाचा शिखर सर करतात हे पाहिले आहे. त्यातीलच एक म्हणजे विठ्ठलवाडी (ता.माढा) येथील सचिन तुकाराम कदम. आई-वडील दोघेही निरक्षर असताना देखील, त्यांनी शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनामुळे, प्रेरणा घेऊन जिद्द व चिकाटीच्या जोरावरच पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

त्यांची ही यशोगाथा त्यांच्या यशाबद्दल पोलीस उपअधीक्षक सचिन कदम सांगतात की, प्राथमिक शिक्षण विठ्ठलवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावातीलच संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय मध्ये झाले. एक भाऊ एक बहीण असे आम्ही तिघे भावंडे व आई व वडिल असे छोटेसे कुटुंब. वडील रेल्वेत कामाला होते. तर आई शेतीची कामे करत असायची. त्यावरच कुटुंबाचा आर्थिक गाडा चालत असायचा. वडिलांचे थोडेफार शिक्षण झालेले पण आईचे शिक्षण काहीच झाले नव्हते. परंतु तरीदेखीलही आईवडिलांची आमच्या लहानपणापासून शिक्षणासाठी धडपड असायची. 'आपल्याला शिक्षण घेता आले नाही.

आपण निरक्षर असल्याने, आपल्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे. आपल्यावर जी वेळ आली ती मुलांवर येऊ नये. अशी खंत आईवडिलांना सतत वाटत असे. त्यामुळे आपल्या मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घ्यावे' यासाठी त्यांची कितीही कष्ट करण्याची तयारी होती. त्यांची तळमळ व धडपड बघुनच शिक्षणासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार पक्का केला. परंतु अजून ध्येय पक्के केले नव्हते.

दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर, सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बारामती येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या महाविद्यालयातुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. येथील महाविद्यालयाच्या वातावरणात स्पर्धा परीक्षाबद्दल माहिती मिळाली. व प्रशासकीय सेवा बद्दल आकर्षण वाढले. आपण देखील स्पर्धा परीक्षा करावी असा एक आत्मविश्वास निर्माण झाला.

याकाळातच अभियांत्रिकीचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधीदेखील निर्माण झाली. परंतु अधिकारी होण्याचे स्वप्न अधिक बळकट होऊ लागले होते. अभियांत्रिकीची पदवी हातात असल्याने, नोकरी तर कधीही मिळणार याची शाश्वती होती. त्यामुळे आई-वडिलांची परवानगी घेऊन स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. आत्मविश्वास चांगला असल्याने प्रथमता यूपीएससी करण्याचा निर्धार केला. आई-वडिल दोघेही निरक्षर असुन देखील, त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत आम्हाला कसलीही कमतरता भासू दिली नाही.

त्यांच्या कष्टाचे चीज करण्याची हिच खरी संधी असुन, त्यामुळे जिद्द चिकाटीने अभ्यास जोमात सुरू केला. अभ्यासाच्या जोरावर यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली, परंतु अंतिम यादीत नाव आले नाही. अशीच दोन तीन वर्ष मुख्य परीक्षा, मुलाखतीपर्यंत निवड होत असायची परंतु अंतिम यादीत अपयशास सामोरे जावे लागत असायचे.

त्यामुळे स्पर्धा परीक्षा करण्यापुर्वीच 'प्लॅन बी' देखील ठरवला होता. त्यानुसार यूपीएससी बरोबरच एमपीएससी देखील करण्याचा निर्णय घेतला. अन् तो यशस्वी देखील झाला.त्याचवेळी लहान बहीण सोनाली ही सुद्धा एमपीएससी करत होती. त्यामुळे दोघांनीही एकत्रच एमपीएससीची तयारी केली. 'अभ्यास एके अभ्यास' हा ध्यास पक्का करून, राज्यसेवेतून पहिल्याच प्रयत्नात आम्हा दोघांचीही पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली. अन् खऱ्या अर्थाने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे मनोमन समाधान वाटु लागले. त्यांनी शून्यातून उभा करत आम्हाला तुम्ही करू शकता असा एक खंबीर पाठींबा दिला. त्यामुळे यश संपादन करता आले. तसेच विठ्ठलवाडीकरांचा देखील मोलाचा वाटा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com