बार्शी तालुक्‍यात आंदोलन पेटणार ! सरपंच परिषद, शिवसेनेचा वीज वितरण कंपनीला इशारा

MSEDCL
MSEDCL

बार्शी (सोलापूर) : शासनाच्या आदेशानुसार वीज वितरण कंपनीने मागील तीन-चार दिवसांपासून शेतीसाठी एक तास वीजपुरवठा सुरू ठेवला असून, अनेकांच्या जोडण्या तोडल्या आहेत, तर वीज बिलांसाठी तगादा सुरू केला आहे. सरपंच परिषद, शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वीज वितरण कंपनीला दिला आहे तर आमदार राजेंद्र राऊत यांनी माझ्याशी संपर्क साधा, असे शेतकऱ्यांना म्हटले आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न बार्शीत गाजणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. 

शासन निर्णयानुसार पाच एचपी मोटार असेल तर प्रत्येक एचपीला तीन हजारप्रमाणे 15 हजार रुपये तसेच दोन चालू बिलाची रक्कम, थकबाकीमधील काही रक्कम भरली तरच शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वीज वितरण कंपनीने वीज कपात सुरू केली असून अवघा एक तास वीजपुरवठा सुरू ठेवला आहे. शेतातील हरभरा, द्राक्ष, ऊस, लिंबे, ज्वारी, कांदा यांचे अंतिम टप्प्यात पीक आले असताना शेतकरी अडचणीत सापडला असून, उन्हाळ्यामुळे उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. 
काहीही करा पण शेतीचा वीजपुरवठा सुरू करावाच लागेल, तसेच ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनाही अडचणीत आल्याने शासनाच्या निषेधार्थ सरपंच संघटना, शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. 

आमदार राजेंद्र राऊत यांनी मंगळवारी वीज वितरण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात राज्य मागील एक वर्षापासून कोरोनाच्या विळख्यात असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर अतिवृष्टी झाली, शेतकरी कायम अडचणीत असून पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील मजुरीचा खर्च परवडत नाही, बी-बियाणे, खते, औषधे, पीव्हीसी पाइप यांच्या किमती दीड पटीने वाढल्या आहेत. आणि आता वीजबिलाचे संकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक झाली असून शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले. 

काही शेतकऱ्यांनी वीजबिल भरले आहे, तरी त्यांचा वीजपुरवठा सुरू केला जात नाही. तर काहींची बाकी नसतानाही वीज मिळत नाही, अशी वस्तुस्थिती असून त्या डीपीवरील इतर शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू होणार नाही, अशी भूमिका वीज वितरणची आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर कोण जबाबदार, असा प्रश्न बार्शी तालुक्‍यात निर्माण झाला आहे. 

शासनाच्या आदेशानुसार शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. 50 टक्के रक्कम तसेच इतर पर्यायही शासनाने योजनेत दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी बिले भरली आहेत त्यांचा वीजपुरवठा त्वरित सुरू केला जाईल. त्या डीपीवरील इतरांची जोडणी बंद करून बिल भरलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. 
- दीपक लहामगे, 
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, बार्शी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com