दीड वर्षाने शहरातील आठवी ते बारावी तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची घंटा वाजली आहे. मात्र...
सोलापूर : दीड वर्षाने शहरातील आठवी ते बारावी तर ग्रामीणमधील पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची (School) घंटा वाजली आहे. शासनाच्या निकषांनुसार पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार 549 शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, पंढरपूर (pandharpur), माळशिरस (Malshiras), करमाळा (Karmala) व सांगोला (Sangola) तालुक्यासह अन्य काही ठिकाणच्या 321 शाळा बंदच ठेवण्यात आल्या. शाळा असलेल्या गावात तथा विद्यार्थ्यांच्या गावात सध्या पाच अथवा दहापेक्षा अधिक कोरोनाचे (Covid-19) रुग्ण असल्याने तो निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या दोन्ही लाटांचा अनुभव विचारात घेऊन शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात शहरातील आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असून बहुतेक विद्यार्थ्यांकडे ऍन्ड्राईड मोबाईल नसल्याने ते विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले. त्यांच्यातील शिक्षणाची गोडी कायम राहावी, शिक्षणाच्या प्रवाहापासून ते दूर जाऊ नयेत, या हेतूने पाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली. तरीही, जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे बोट दाखवत, स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, काही शाळांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुलगा शाळेत आला म्हणजे पालकांची संमती आहे, असे समजून त्याला वर्गात बसू द्यावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे. शाळेत उपस्थित राहणे हे बंधनकारक नाही. कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत ही सवलत मुलांसाठी लागू राहणार आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या गावांमधील शाळा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणची परिस्थिती सुधारल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागर्दशनाखाली पुढील निर्णय होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लस घेतली नसेल तरीही शिक्षकांनी 100 टक्के उपस्थित राहावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहर-जिल्ह्यातील शाळांची स्थिती (पाचवी ते बारावी)
एकूण शाळा : 2,549
शाळांमधील एकूण मुले : 3.01 लाख
शाळांमधील मुली : 2.57 लाख
ग्रामीणमधील शाळा (पाचवी ते आठवी) : 1,923
शहरातील शाळा (आठवी ते बारावी) : 305
सुरू झालेल्या शाळा : 2,228
कोरोनामुळे बंद शाळा : 321
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.