सोलापूर : पावसाळ्यात शहरातील घरांची पडझड, कुठे पाणी साचले किंवा घरात पाणी साचले, अशा काही आपत्ती आल्यास नागरिकांना तत्काळ मदत मिळावी म्हणून महापालिकेच्या वतीने आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार आहे. त्याची सुरवात उद्यापासून (सोमवारी) होणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील नालेसफाईची कामे सुरू आहेत. शहरातील ५८ नाल्यांची सफाई अंतिम टप्प्यात आली असून, २५ मेपर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. आठ झोनमधील नाल्यांतून निघालेला कचरा दोन दिवसांनी उचलून कचरा डेपोत टाकला जात आहे. शहरातील कुमार चौक, विडी घरकुल अशा ठिकाणी पाणी साचत होते. त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या जेसीबीचा वापर करून कचरा काढला जात आहे. झोन एक व सहा येथील नाल्यांची सफाई खासगी मशिनरींच्या साह्याने केली जात आहे. नगर सचिवांच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. यंदा पावसाळा जोरात असल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष रात्रंदिवस सुरू ठेवला जाणार आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करतील. कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आठ तासांची ड्यूटी बंधनकारक केली जाणार आहे. शहरात अनेक जुन्या इमारती असून त्या ठिकाणी अजूनही लोक राहतात. दरवर्षी काही घरांची पडझड होते. अनेक ठिकाणी पाणी साचते, घरात पाणी जाते, त्या नागरिकांची समस्या तत्काळ दूर व्हावी, हा या आपत्ती नियंत्रण कक्षाचा हेतू असणार आहे.
असे असणार ‘आपत्ती’ नियंत्रण
- रात्रपाळीसाठी नियुक्त असतील दोन ज्युनिअर इंजिनिअर
- तीन शिफ्टमध्ये चालणार आपत्ती नियंत्रण कक्षाचे कामकाज
- सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत तीन शिफ्टमध्ये चालणार काम
- शहरातील नागरिकांनी आपत्ती आल्यास ७४०३३५ या नंबरवर करावा कॉल
- सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते रात्री १२ आणि रात्री १२ ते सकाळी आठपर्यंत कर्मचाऱ्यांना ड्यूटी
- आपत्ती व्यवस्थापनासाठी जेसीबी, ट्रकसह अन्य मशिनरी व अधिकारी, कर्मचारी केले जाणार नियुक्त
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.