Solapur : सर्वोत्तम आरोग्यासाठी शहाळे अमृतजल!

निसर्गाचे वरदान; वजन नियंत्रणासाठी अन्‌ अनेक आजारांत गुणकारी
शहाळे पिणे
शहाळे पिणे sakal

सोलापूर : सुदृढ आरोग्यासाठी शहाळे पिणे हितकारक असून, वजन नियंत्रण करण्यापासून वेगवेगळ्या आजारांवर नारळ पाणी हे गुणकारी आहे. शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. ‘चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ’ ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे.

नारळ पाण्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, यात भेसळ होणे शक्य नाही. निसर्गाने नारळातून जे काही अनमोल असे दिले आहे, त्यात कोणीही कसलीही भेसळ करू शकत नाही. नारळाचे पाणी नेहमीच फ्रेश असते. ते कधी शिळे होत नाही. ते थंड असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्याचा उपयोग होतो. शहाळ्यातल्या मॅग्नेशियममुळे इन्शुलिन सेन्सिटीव्हिटी वाढते आणि मधुमेहाच्या रुग्णाला दिलासा मिळतो. ब्लड शुगर लेव्हल कमी होते. नारळाच्या पाण्यातील सोडियम आणि काही जीवनसत्त्वे ही ब्लड शुगर कमी करण्यास मदत करीत असतात.

शरीरासाठी पोषक; पचनक्रिया सुधारते

पतंजली योगपीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज गरदडे सांगतात की, नारळ पाणी आपल्या शरीरातील अतिरिक्त तापमान कमी करून शरीराला थंडावा देण्याचे काम करते. नारळ पाणी पिल्यामुळे शरीराच्या पेशींतील पोषक तत्त्वे आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते; तसेच वजन नियंत्रणात राहते व पचनक्रिया सुधारते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि डिहायड्रेशनमुळे आलेला अशक्तपणा कमी होतो.

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ

नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळची आहे. यासाठी दररोज उपाशीपोटी नारळ पाण्याचे सेवन तुम्ही करू शकता. याशिवाय व्यायाम करताना किंवा व्यायामानंतर, दुपारी जेवणानंतर किंवा सायंकाळी नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे तुमचे वजन कमी होते आणि शरीराला ऊर्जाही मिळते.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

दररोज नारळ पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते

सकाळी नारळ पाणी पिल्याने संपूर्ण दिवस शरीरात एनर्जी राहते

प्रोटीन, खनिज आणि कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर; रोगप्रतिकारक क्षमता वाढते

व्हिटॅमिन सी, मॅग्नेशिअम आणि पोटॅशियम यांचे पुरेसे प्रमाण

नारळाचा आहारातील वापर आरोग्यदायी

आहारतज्ज्ञ ललिता पेठकर सांगतात की, शहाळे हे सर्व ऋतूंमध्ये पिण्यासाठी उपयुक्त असून, ते बारा महिने उपलब्ध असते. अनेक खनिजे, जीवनसत्त्वे, मँगेनीज, पोटॅशियम यांसारख्या घटकांचा यात समावेश असल्यामुळे व्यायामापूर्वी घेतल्यास अधिक उपयुक्त ठरते. मुळात नारळ हा कल्पतरू असून, नारळाचा आपल्या आहारात वापर केल्यास अत्यंत आरोग्यदायी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com