सोलापूर : शहरातील शांतीधाम स्मशानभूमीत अपुरे पथदिवे, खड्ड्यात साचलेले पाणी, खंडित वीज पुरवठा या प्रकाराने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकवेळा वीज पुरवठ्याअभावी दुचाकीच्या हेडलाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.
पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, सचिव ॲड. रेखा गोटीपामूल व सहसचिव ममता तलकोकूल यांनी पत्र देऊन महानगरपालिकेचे लक्ष वेधले आहे.
पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या शांतीधाम स्मशानभूमीच्या मागे नवीन रस्ता तयार झाला. या रस्त्यावर रहदारी वाढली पण पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालक व नागरिकांना अपघात होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्यावर पथदिवे बसवावेत. पावसाचे पाणी नवीन रस्त्यालगत साचल्याने नवीन रस्ता उखडून जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने साचलेले पावसाचे पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे.
शांतीधाममध्य अनेकवेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती निर्माण होते. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकलच्या हेडलाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याचे प्रकार अनेकवेळा घडले.सर्व स्मशानभूमीत दोन-तीन फुटांवर पथदिवे असताना शांतीधाम स्मशानभूमीत वीस फुटांवर पथदिवे लावल्याने परिसरात अंधार जास्त असतो.
त्यामुळे या स्मशानभूमीत पथदिवे कमी अंतरावर बसवून त्याची संख्या वाढवावी. स्मशानभूमीत अनेक छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे पाणी साचून डबकी होतात.त्यावर डासांची उत्पत्ती वाढत आहे. कर्णिकनगर व पद्मनगरहून ड्रेनेज लाईन शांतीधाम स्मशानभूमीतून गेली आहे. महालक्ष्मी मंदिरासमोर स्मशानभूमीच्या जागेत ड्रेनेज फुटल्याने दुर्गंधी व डागांमध्ये वाढ होत आहे.