सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करताना स्थानिक विकासाचे मुद्दे बाजूला सारत दोन्ही उमेदवारांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करायला सुरवात केली आहे. प्रचारसभांमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते व काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी एकमेकांच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये घसरलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी आज पातळी ओलांडल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते एका कार्यक्रमात म्हणाले, ‘देशाअंतर्गत दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी २००२ मध्ये पोटा कायदा झाला.
त्यातील सोलापूरच्या १२ दहशतवाद्यांना सोडण्याचे पाप सुशीलकुमार शिंदेंनी केले’. भगवा आतंकवाद हा शब्द देखील पहिल्यांदा त्यांनीच उच्चारला असून देशाला लागलेला हा कलंक पुसण्याची वेळ आता आली आहे.
पुलवामा भाजपने घडवून आणला म्हणायला त्यांना लाज वाटायला हवी. हा आमचा नव्हे तर देशाचा अपमान आहे.’ दुसरीकडे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘ज्यावेळी यांच्याकडे निवडणुकीसाठी विकासाचे मुद्दे नसतात तेव्हा जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करते.’
पुलवामा येथील घटना देखील भाजपनेच घडवून आणली असे त्यांचेच अधिकारी म्हणत आहेत’, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, सोलापूरच्या एका युवकाने पत्राच्या माध्यमातून येथील स्थलांतर, बेरोजगारी, पाणी अशा विविध प्रश्नांवर दोन्ही उमेदवारांचे लक्ष वेधले होते.
याशिवाय इतर सोलापूरकरांनी देखील स्थानिक प्रश्न सोडवून बेरोजगारी व विमानसेवा, दर्जेदार शिक्षण, नोकरी यासाठी काम करणाऱ्यासोबत आम्ही राहू अशी ग्वाही दिली आहे. मात्र, सध्यातरी भाजपचे उमेदवार सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना टार्गेट केले असून आमदार प्रणितींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० वर्षांतील आश्वासनांवर बोट ठेवले आहे.
१) आमदार राम सातपुते म्हणाले, ‘सोलापुरात विमानतळ होण्यासाठी व आयटी पार्क येण्यासाठी श्री. शिंदे यांनीच अडथळा आणला. दक्षिण आफ्रिकेत स्वत:चे चहाचे मळे तयार केले. राहायला दुसरीकडे आणि काही दिवसांतून एकदा सोलापूरला यायचे आणि फोटो काढून पुन्हा जायचे, असा कारभार त्यांनी केला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सोलापूरसाठी काय केले, याचा हिशोब द्यावा’.
२) आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘ज्यावेळी भाजपकडे निवडणुकीसाठी मुद्दे नसतात तेव्हा ते गुद्द्याची भाषा करतात.’ दोन गटात, जाती-धर्मात वाद लावून भांडणे लावण्याचे काम तेच करतात. त्यांचेच अधिकारी म्हणतात, निवडणुकीसाठी पुलवामा येथील घटना घडवून आणली.’ एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण आतापर्यंत कोणीच केले नाही’.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.