Solapur : सोलापूरची खासदारकी काँग्रेससाठी कठीणच

राजकारणात अशक्य काहीच नसते. मतदार कधी कोणाला ‘रावाचा रंक’ करतील हे खात्रीशीरपणे कोणीच सांगू शकत नाही
BJP
BJPesakal

राजकारणात अशक्य काहीच नसते. मतदार कधी कोणाला ‘रावाचा रंक’ करतील हे खात्रीशीरपणे कोणीच सांगू शकत नाही. २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविलेल्या ॲड. शरद बनसोडेंचा पराभव झाला आणि त्यांनी राजकारणाचा नादच सोडला, अशी स्थिती होती. पण, २०१४च्या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला आणि खासदार झाले.

तत्पूर्वी, १९९६ मध्ये खासदार राहिलेल्या लिंगराज वल्याळ यांना पुढील दोन्ही निवडणुकीत अपयशच आले. दरम्यान, १९६२ ते १९६७ पर्यंत खासदार राहिलेल्या मडेप्पा काडादी यांनाही १९७७च्या निवडणुकीत पराभवाचा दणका बसला. १९५२ पासून काँग्रेसचे सुरजरतन दमाणी व सुशीलकुमार शिंदे हे दोन नेते वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी कोणालाच तिसऱ्यांदा संधी दिली नाही. त्यामुळे आता काँग्रेसचा उमेदवार वेगळाच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- तात्या लांडगे

सोलापूर लोकसभा मतदारसंघावर १९६२ पासून १९९६ पर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. पण, लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातील काँग्रेसची मक्तेदारी मोडून १९९६ च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपला यश मिळवून दिले. त्यानंतर हातून निसटलेला मतदारसंघ २००३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते-पाटलांनी भाजपकडे आणला. त्याचा फायदा भाजपला झाला आणि २००४ ते २००९ या काळात सुभाष देशमुख खासदार राहिले.

त्यांनी उज्वला शिंदे यांचा पराभव करून सुशीलकुमार शिंदे यांना पहिला धक्का दिला. परंतु, पुढे भाजपने ॲड. शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या हातून काँग्रेसकडे गेला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे हे खासदार झाले आणि पक्षाने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे गृहमंत्रिपद दिले. पण, त्या काळात मतदारसंघाकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून गेला आणि शिंदे यांना २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. मोदी लाटेत पराभव झाल्याचे मानून त्यांनी २०१९ची निवडणूक लढवली. पण, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात एन्ट्री केली आणि भाजपने जातीचे कार्ड खेळत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना मैदानात उतरवले.

तिरंगी लढतीत पुन्हा एका शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा भाजप उमेदवार बदलेल, असे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आगामी निवडणुकीत प्रणिती शिंदे लोकसभेच्या उमेदवार असतील,असे तर्क लढवले आहेत.

खासदारकीसाठी पाच लाख मतांची गरज

सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आतापर्यंत भाजपचे १८ ते १९ वर्षे वर्चस्व राहिले आहे. १९९६ ते १९९८ या काळात लिंगराज वल्याळ, २००३ ते २००४ पर्यंत प्रतापसिंह मोहिते-पाटील, २००४ ते २००९ सुभाष देशमुख, २०१४ ते २०१९ ॲड. शरद बनसोडे आणि २०१९ पासून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी खासदार आहेत.

मागील दोन्ही निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या मतदानाची तुलना केल्यास असे लक्षात येते, या मतदारसंघातील सव्वापाच लाख मतदार भाजपसोबत असून काँग्रेसला दोन्ही वेळेस तीन लाख ६८ हजारांवर जाता आलेले नाही. विजयासाठी आता काँग्रेसला आणखी पावणेदोन लाख मतदार जोडावे लागणार आहेत. त्याचवेळी पूर्वीचे मतदार दुरावणार नाहीत, याची देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने उमेदवार द्यावा लागेल, असेही बोलले जात आहे.

‘सोलापूर’ मतदारसंघावर ४६ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व

सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा आणि सोलापूर शहरातील शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघातून आतापर्यंत काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघावर एकूण ४६ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

पण, आता शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व पंढरपूर-मंगळवेढा या चार विधानसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असून मोहोळमधील काही माजी लोकप्रतिनिधी भाजपच्या वाटेवर आहेत. ‘दक्षिण’चे माजी आमदार दिलीप माने हेही सध्या काँग्रेसमध्ये नाहीत. शहरातील बरेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे काँग्रेससाठी आगामी निवडणूक कठीण मानली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com