सोलापूर : रिक्षाचालक खूश, प्रवासी मेटाकुटीला !

रिक्षा भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री; नाराजीचा सूर
Solapur rickshaw
Solapur rickshawsakal

सोलापूर : ऑटो रिक्षाच्या प्रवासी भाडेवाढीमुळे रिक्षाचालक खूश तर सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवाशांनी ‘सकाळ’शी बोलताना दिल्या आहेत. सोलापूरकरांना आता रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

जीवनावश्यक बाबींच्या दरात वाढ होत असताना ऑटो रिक्षाच्या भाड्यामध्ये तब्बल १० ते १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका प्रवाशांच्या खिशाला बसत आहे.पेट्रोल व सीएनजी गॅसची दरवाढ, रिक्षांचा वाढलेला विमा हप्ता, मोटार वाहन करातील वाढ, अशा विविध अडचणी असतानाही रिक्षाचालक जुन्याच पद्धतीने भाडे घेऊन प्रवाशांना सेवा देत होते. अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून सोलापूर आरटीओ कार्यालयाने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी साधारणत: २०१२ मध्ये रिक्षांच्या प्रवासी भाडेदरात वाढव करण्यात आली होती.

त्यावेळी ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर डिझेलचा दर होता. सध्या डिझेलचा दर १०० रुपयांवर गेला आहे.महापालिकेची परिवहन सेवा मोडकळीस आल्याने शहरातील खासगी रिक्षांनी प्रवाशांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मागील काही महिन्यांपासून वाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांबरोबरच वाहन चालकांनाही बसला आहे. सरकारच्या विविध निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महागाई आणखीन किती वाढणार, याची चिंता भेडसावत आहे.

- लखन घोडकुंबे, वाहनचालक

महागाईचा उच्चांक वाढत आहे व त्यातच रिक्षाच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात करण्यात आल्याने खर्चाचे नियोजन बिघडले आहे. मुलांना रिक्षातून शाळेत पाठवीत असल्याने रिक्षाचालक भाडे वाढवून घेतल्याने महिन्याचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

- अश्विनी सलगर, गृहिणी

महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिवणी गावातून एसटी नसल्याने रिक्षा किंवा जीपने रोज ये-जा करावी लागते. त्याचा गैरफायदा घेत रिक्षा आणि जीपवाले अमाप भाडे आकारतात. याची दखल घेऊन एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी. तसे प्रयत्न ‘सकाळ’च्या माध्यमातून व्हावेत.

- ओम गुंड, विद्यार्थी, ता. मोहोळ

सैफुल येथील सोनी महाविद्यालयात शिकते. बाळे भागातून सिटी बस नसल्याने आम्हाला दररोज रिक्षाने स्टँडपर्यंत २० रुपये देऊन यावे लागते. तेथून सैफुलला जाण्यासाठी ३० रुपये लागतात. दररोज ये-जा करण्यासाठी १०० रुपये खर्च होतात. यात आणखीन वाढ झाल्याने मोठा खर्च होणार आहे. महापालिकेच्या परिवहन खात्याने बाळे भागातून सिटी बस सुरू करावी.

- श्रद्धा वेदपाठक, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com