मळेगाव : बार्शी तालुक्यात परतीच्या पावसाचे सुरू असलेले धुमशान काय थांबायचे नाव घेईना असे झाले आहे. मळेगाव परिसरातील साकत, पिंपरी, हिंगणी, उपळे, ढाळे पिंपळगाव, हिंगणी धरणक्षेत्र परिसरात सलग सात दिवस झालेल्या अतिवृष्टीत सोयाबीन, कांदा, द्राक्ष, टोमॅटो, मका, पपई, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
काढणीला आलेल्या सोयाबीन पिकास कोंब फुटू लागले आहेत. टोमॅटोचा लाल चिखल झाला. कांद्याचा रेंदा झाला, छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत पोग्यात असलेले द्राक्ष घड विरघळून गेले आहेत. अनेक ठिकणी शेताचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली आहे. या अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी हतबल व निराश झाला आहे.
पिंपरी (सा) येथील शेतकरी अनिल आत्माराम काटमोरे यांनी दीड एकर शेतात टोमॅटोची लागवड केली. अंदाजे एक लाख रुपये इतका खर्च करून चमकदार,दर्जेदार टोमॅटो पिकवले. दोनवेळा टोमॅटो बाजारात विक्रीसाठी पाठवले, त्यातून नाममात्र रक्कम मिळाली.
त्यानंतर परतीच्या पावसाच्या तडाख्यात टोमॅटोचे दरही घसरले आणि शेतात टोमॅटोचा लाल चिखलही झाला. अनिल काटमोरे यांच्या शेतातील टोमॅटो, सोयाबीन, कांदा या तिन्ही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुलांचे शिक्षण, कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.
सोयाबीनचे पंचनामे झाले, फळबागांचे पंचनामे झाले. मात्र नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. हतबल व उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने नुकसानभरपाई रक्कम देऊन मदतीचा हात द्यावा अशी विनंती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.