अनगर (सोलापूर) : जिल्ह्यात सध्या सर्वदूर पाऊस पडत असताना उजनीच्या कालव्याला पाणी सोडण्याची गरज नसतानासुद्धा संबंधित विभागाच्या गहाळ कारभारामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना पाणी सोडले जात आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून प्रथमत: धरण पूर्ण क्षमतेने भरून घ्यावे, अशी मागणी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे.
अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची भेट घेऊन विक्रांत पाटील यांनी ही मागणी केली आहे. विक्रांत पाटील म्हणाले, की उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस कमी असल्यामुळे उजनी धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरले नाही. सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून सर्वदूर पाऊस असून ओढे, नाले, तलाव तुडुंब भरलेले आहेत. सीना नदीलाही पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता नाही. तरीही जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे उजनीच्या कालव्यांमधून, बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताच उपयोग होत नसून पाण्याचा अपव्यय होत आहे. भविष्यात शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारी टंचाई पाहता प्रथमतः उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून करावे, असे श्री. पाटील म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा बॅंकेचे संचालक भारत सुतकर, सरचिटणीस प्रशांत बचुटे, पेनूरचे उपसरपंच रामदास चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, उपसरपंच विजय कोकाटे, युवा नेते सचिन चवरे, कार्याध्यक्ष विकास कोकाटे, सरपंच पोपट जाधव, सरपंच संदीप पवार, सिद्धेश्वर बचुटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.