उजनीचा कालवा फुटला, भिंत कोसळली, जबाबदार कोण? एकाच उपअभियंत्याकडे ३-३ विभागांचा पदभार

जलसंपदा विभागाकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता हेच मुख्य कारण यामागे असल्याचे सांगण्यात येते. कालव्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे आहे. हा प्रकार होण्यामागे आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.
ujani canal
ujani canalsakal

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाटकूल हद्दीतील उजनीचा डावा कालवा फुटून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली. जलसंपदा विभागाकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता हेच मुख्य कारण यामागे असल्याचे सांगण्यात येते. कालव्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे आहे. हा प्रकार होण्यामागे आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. तातडीने पदभरती न झाल्यास भविष्यात असे प्रकार होण्याची नामुष्की ओढवेल

कालव्यातील गाळ काढण्याचे काम तीनवेळा झाल्याची सरकार दप्तरी नोंद झाली आहे. परंतु, तीनवेळा काम होऊनही कालव्याची क्षमता का वाढली नाही? आता पुन्हा नव्याने या कालव्याच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून जलसंपदा विभागासाठी कोट्यवधींचा निधी मिळेल. मग आता तरी हे काम दर्जेदार होऊन त्याची क्षमता वाढविणारे ठरेल का? कोट्यवधींचा हा खर्च सत्कारणी लागावा व उजनीचे कालवेही सक्षमच व्हावेत इतकीच अपेक्षा आहे.

सध्यातरी पाटकूलजवळील वाहून गेलेला डावा कालवा दुरुस्तीचे काम अजूनही सुरुच आहे. कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण कधी होणार, या भागातील शेतकऱ्यांना हक्काचे रोटेशनचे पाणी कधी मिळणार? शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधी भरून मिळणार? गाळाने भरलेल्या विहिरी, मोटारींचे नुकसान, वाहून गेलेली शेततळी, फळबागा, पिकांचे झालेले नुकसान हे मन हेलावणारे विदारक दृष्य दिसते आहे. जमिनीचे सपाटीकरण करणे, पुन्हा नव्याने आपल्या जमिनीची मशागत करणे ही आव्हाने या शेतकऱ्यांसमोर आहेत. सुमारे ३०० हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याचा अंदाज होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचनामे केले गेले. उजनीचा डावा कालवा फुटल्याच चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली. समितीने चौकशीही केली. त्याचा अहवालही वरिष्ठांकडे पाठविण्याचे सोपस्कर झाले. परंतु, या समितीने नेमकी चौकशी काय केली? त्यातून निष्पन्न काय झाले? या समितीच्या कार्यकक्षा काय होत्या? हे प्रश्‍नही तसे अनुत्तरीतच आहेत. भविष्यात कॅनॉलच्या कामासाठी नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची गरज भासणार आहे. सरकार पातळीवर याबाबीचा गंभीरपणे विचार करावा लागेल. कालवा फुटून झालेल्या नुकसानीचे परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावे लागत आहेत, याचाही विचार होण्याची गरज आहे.

पंढरपूर येथील घाटावरील भिंत पावसामुळे कोसळली. हा नैसर्गिक की मानवनिर्मित अपघात होता, याची चौकशी झाली नाही. परंतु, या कोसळलेल्या भिंतीखाली सहाजणांचा बळी गेला. दुर्दैवाचीच ती घटना असा त्याचा उल्लेख करावा लागेल. दर दोन-चार वर्षात एकदा तरी उजनी जलाशय संपूर्ण भरून वाहतो. भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याचे नियोजन करताना काही तांत्रिक चुका होतात, त्यातूनही अनेकवेळा पंढरपुरात महापुराची स्थिती निर्माण होते. जलसंपदा विभागाच्या कामकाजाबाबत सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेचाच सूर निघत आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये अचानक दोन दिवसात हजारो मिलीमीटर पाऊस झाल्याने उजनी धरण धो-धो भरून वाहिले. नंतर मात्र ते ‘मायनस'मध्ये गेले. शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरूनही उजनी धरण अनेकवेळा मायनसमध्ये जाण्याचा प्रकारही अनेकवेळा होत असतो. ज्याच्या हाती काठी तो... अशा नियमाप्रमाणे उजनी धरणातील पाणी वाटपामध्ये अनेकवेळा नव्हे तर कायमच दुजाभाव होत असतो. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनी जास्त पाणी देण्याने चिबाड झालेल्या दिसत आहेत. हा फटका मोठा आहे. तरीही शेतकऱ्यांना समजत नसल्याचे प्रकार घडत आहेत. काही भागांना मिळणारे उजनीचे पाणी व पाणी मिळण्यासाठी आसुसलेले शेतकरी अशी विदारक स्थिती या जिल्ह्यात नेहमीच पहावयास मिळते.

कामाच्या गुणवत्तेचा ताळमेळ कसा?

गेल्या तीन वर्षात जलसंपदा विभागाने देखभाल, दुरुस्तीवर किती खर्च केला? या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल ते आकड्यात... परंतु, प्रत्यक्षात केलेले काम व त्याची गुणवत्ता याचा ताळमेळ मात्र कसा बसवणार हा प्रश्‍न पुन्हा अनुत्तरीत राहील. जलसंपदा विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्यास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, त्याची कारणमीमांसा कशी करणार? जलसंपदातील तीन-तीन विभागांचा पदभार एकाच उपअभियंत्याकडे आहे. एका अधिकाऱ्याकडे किती पदभार असावेत, याला काहीही फूटपट्टी लावलेली नाही. मनुष्यबळ कमी असल्यानेच हा प्रकार होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com