मंगळवेढा - तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून, टँकर मागणीचा प्रस्ताव देऊन देखील टँकर देण्यासाठी प्रशासन स्थळ पाहणी व प्रस्तावातील त्रुटींच्या नावाखाली चालढकल करीत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी दुष्काळी जनतेच्या तोंडाला फेस आला आहे, तर राज्यकर्ते मात्र प्रचारात व्यस्त आहेत.
तालुक्यामध्ये दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत असते. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने जानेवारी महिन्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करून त्या संदर्भातील उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु या संदर्भात कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या येड्राव येथे पाण्याचा टँकर सुरू आहे. तर आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप सुरू असून, काम पूर्ण न झाल्यामुळे आंधळगाव, गणेशवाडी येथून टँकरची मागणी आहे. भोसे प्रादेशिक योजनेतील शिरनांदगी, भोसे, निंबोणी, हाजापूर, हिवरगाव, भाळवणी, सोड्डी, नंदेश्वर या गावांनीही पाण्याचे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले आहेत.
याबाबत २२ मार्च रोजी प्रशासनाने स्थळ पाहणी देखील केली; मात्र अद्याप टँकर सुरू केला नाही. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी सातत्याने खंडित असून, आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. गावठाणात मात्र वाड्या- वस्त्यांवरील जनावरे आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परंतु प्रशासनाने टँकर मागणीची अद्याप पूर्तता केली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांतून प्रशासनाच्या कागदोपत्री कामकाजाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना वेठीस धरू नये
आंधळगाव येथे स्थळ पाहणीला गेलेल्या प्रशासनातील अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होऊन पोलिस बंदोबस्त मागवण्यापर्यंत प्रकरण विकोपाला गेले होते. परंतु प्रशासनाने मूळ मागणी समजून घेतली पाहिजे. पोलिस प्रशासन किंवा कायद्याचा धाक, शासकीय कामात अडथळा असे निमित्त दाखवून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये, अशी मत सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.
अनेक गावांत जलजीवनचे काम संथगतीने सुरू आहे. प्रशासनाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करा, असे सांगतात; परंतु प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. प्रशासनातील कामात ‘प्रोसेस सुरू आहे’ या नावाखाली चालढकल करता येते; मात्र माणसांना व जनावरांना लागणाऱ्या पाण्याची तरतूद करता येत नाही. प्रसंगी जनतेला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे.
- बिरुदेव घोगरे, सरपंच, निंबोणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.