World Womens Day : महिलांमधील रक्तक्षय, कॅल्शिअमची कमतरता, कर्करोगावरही मात शक्य

योग्य आहार, जीवनशैली, कर्करोग प्रतिबंधक लसीमुळे महिलांना नवजीवन
Dr. Kiran Sarda
Dr. Kiran Sardasakal

सोलापूर - रक्तक्षय, कॅल्शिअमची कमतरता व कर्करोगाचे वाढते प्रमाण या तीन आरोग्य समस्या महिलांच्या समोर सर्वात गंभीर स्वरूप घेणाऱ्या आहेत. या आजारांवर उपचार उपलब्ध असले तरी स्वतःच्या आहारविहारातून (जीवनशैलीतून) या आजारावर मात करण्यासाठीचे बदल महिलांना स्वीकारावे लागणार आहेत.

महिलांना सातत्याने रक्तक्षय (ॲनिमिया) हा आजार कायम असतो. रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे हे त्याचे कारण असते. मुळातच रक्तात हिमोग्लोबीन कमी असल्याने शरीरातील अवयवांना देखील त्याचा फटका बसतो. त्यासाठी हिमोग्लोबीन तयार करण्यासाठी पुरेसे लोह, प्रथिने, जीवनसत्त्व सी व जीवनसत्त्व बी आहारात असल्यास शरीरात हिमोग्लोबीन वाढण्यासारखी स्थिती तयार होते. जे योग्य आहारातून शक्य आहे.

महिलांमध्ये हाडातील कॅल्शिअमची घनता कमी असणे ही एक गंभीर बाब आहे. हाडातील व रक्तातील कॅल्शिअम हे दोन वेगळे आहेत. हाडातील घनता वाढवण्यासाठी कॅल्शिअम युक्त आहार, जीवनसत्त्व डीचा आहार असावा लागतो.

महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग असे प्रकार वाढू लागले आहेत. त्यापैकी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे कारण एक विषाणू असल्याचे संशोधन झाल्याने त्यावर लस निघाली आहे. विशेष म्हणजे हाच कर्करोगाचा प्रकार सर्वाधिक घातक आहे. त्याची लस निघाल्याने हा कर्करोग टाळता येणे शक्य आहे.

आव्हान

रक्तक्षय- रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे. त्यामुळे अवयवांना प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने थकवा येणे. कोणत्याही कामात उत्साह नसणे ही लक्षणे असतात.

आहारातील उपाय

लोहयुक्त, प्रथिनयुक्त, जीवनसत्त्व सी व बी युक्त आहार घेणे. ज्यामध्ये मोड आलेली कडधान्ये, दाळी, अंडी, मासे व दूध घेणे. लोहयुक्त पालेभाज्या खाणे, जीवनसत्त्व सी युक्त लिंबू, आवळा, संत्री आदी फळे घेणे. किमान एक लिंबू जेवणात ठेवावे. जेवणाच्या अर्धातास आधी पाण्यात अर्धे लिंबू पिळून पाणी पिणे. उर्वरित लिंबू वरण किंवा भाजीत टाकून खाणे.

शरिरात कॅल्शिअमचे प्रमाण कमी असणे

कॅल्शिअमचे प्रमाण कमी असेल तर अगदी थोड्या जखमेने हाडे तुटतात. हाडातील ठिसूळपणा वाढत जातो. सांधेदुखी वाढत जाते. उठण्याबसण्याचा त्रास वाढतो.

आहारातील उपाय

कॅल्शिअम युक्त दूध, भेंडी, डिंक, चांगले तूप, दही, लोणी, ताक, पनीर सारखे दुग्धजन्य पदार्थ व जीवनसत्त्व डीसाठी दूध,अंडी, मासे, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात चालणे करावे लागेल. जेवणानंतर एक ग्लास ताक रोज घ्यावे.

कर्करोग

महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग हे दोन प्रकार आहेत. त्यापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोगाने मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. स्तनाच्या कर्करोगात लवकर निदान होणे व उपायाने बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

उपाय

गर्भाशय मुखाचा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा विषाणूंमुळे (एचपीव्ही १६ व एचपीव्ही १८) मुळे होतो असे नवे संशोधन समोर आले आहे. विषाणूचे कारण असल्याने त्यासाठीची प्रतिबंधात्मक लस तयार झाली आहे. ही लस घेता येते. याशिवाय पॅप स्मिअर तपासणीमुळे कर्करोग होण्याची शक्यता खूप आधी लक्षात येऊन कर्करोग टाळला जाऊ शकतो.

रक्तक्षयाच्या आजारावर आहार-विहारातून मात करता येते. त्याच प्रमाणे कॅल्शिअमच्या कमतरतेवर देखील विजय मिळवता येतो. नव्या लसीमुळे तर महिला कर्करोगांना रोखणे शक्य झाले आहे. त्यासाठी ७०-९०-७० असा फॉर्म्युला महिला कर्करोगमुक्तीसाठी ठरवला गेला आहे. ९० टक्के महिलांचे कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण व्हावे. ७० टक्के महिलांचे पॅपस्मिअर तपासणी व्हायला हवी. ९० टक्के महिला योग्य निदान व उपचारातून बऱ्या होऊ शकतात.

- डॉ. किरण सारडा, स्त्रीरोग तज्ज्ञ व व्याख्यात्या, सोलापूर

नियमित व्यायाम

- सर्वांना सूर्यनमस्कार उपयुक्त

- मुलींनी व तरुणींनी सायकलींग करावे

- दोरीवरच्या उड्या माराव्यात

- टीव्हीसमोर अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बसू नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com