#Specialtyofvillage नेत्रदान चळवळीचा अत्याळ वाटाड्या

 #Specialtyofvillage नेत्रदान चळवळीचा अत्याळ वाटाड्या

अत्याळने नेत्रदानाच्या माध्यमातून अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम अव्याहत सुरू ठेवले आहे. हे वेगळेपण त्यांनी स्वत:पुरते मर्यादित न ठेवता शेजारील गावांनाही या वाटेवरून चालण्याइतपत सक्षम केले आहे. गेल्या सहा वर्षांत अत्याळमध्ये २४ आणि शेजारच्या आठ गावांतील १९ ग्रामस्थांचे नेत्रदान याचेच द्योतक म्हणावे लागेल. त्यामुळेच नेत्रदानाबाबत अत्याळ इतरांसाठी वाटाड्या ठरत आहे.

समाजात अंधांची संख्या मोठी आहे. सामाजिक संस्था काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. शासनाकडून योजनांचा आधार दिला जातो; पण त्यांना खरी गरज असते ती दृष्टीची. त्यासाठी आवश्‍यकता असते नेत्रदानाची आणि नेमके हेच काम प्रभावीपणे होत नव्हते. ही बाब हेरून अत्याळ ग्रामस्थांनी सहा वर्षांपूर्वी मरणोत्तर नेत्रदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

याची पार्श्‍वभूमीही मोठी रोचक आहे. पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या अत्याळमध्ये ऐक्‍यातून अनेक कामे झाली आहेत. पूर्वजांचा इतिहास न सांगता त्यामध्ये भर घातली पाहिजे, याच विचारातून गावात चळवळीचा उगम झाला. स्थानिक नेते-कार्यकर्त्यांत टोकाचा राजकीय संघर्ष असला तरी गावच्या विकासासाठी सारे एकत्र येतात, ही बाब चळवळीच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. नेत्रदानाबाबत जाणीव-जागृती निर्माण करणे तसे अवघड; पण प्रबोधनाच्या पातळीवर गावातील प्रत्येक घटकाने झोकून देऊन काम केल्यामुळे गेल्या सहा वर्षांत २४ ग्रामस्थांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे.

अत्याळकरांनी परीघ विस्तारत शेजारील बेळगुंदी, करंबळी, ऐनापूर, कौलगे, भडगाव, नूल, शिप्पूर तर्फ आजरा येथेही चळवळ रुजवली आहे. त्यामुळेच तेथूनही मोठा प्रतिसाद आहे. अत्याळकरांच्या पणतीने या प्रत्येक गावात चळवळीची ज्योत प्रज्वलित झाली आणि त्यातून अंधांच्या जीवनातील अंधकार दूर होत आहे.

कार्यकर्ता हेच सर्वोच्च पद
चळवळीची कोणतीही समिती नाही. कार्यकर्ता हेच सर्वोच्च पद आहे आणि प्रत्येक ग्रामस्थ चळवळीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे श्रेयवादाचा मुद्दा गळून पडला आहे. कोणत्याही सामाजिक कामाला पैशापेक्षा माणसांची अधिक गरज असते. हेच सूत्र अवलंबून चळवळ ‘झिरो बॅलन्स’वर सुरू आहे. आगाऊ निधी जमा केला जात नाही. हार, सत्कार, पुरस्काराला फाटा दिला आहे. मोठे काम उभारूनही गेल्या सहा वर्षांत एकाही कार्यकर्त्याने सत्कार स्वीकारलेला नाही. पुरस्कार तर दूरची गोष्ट आहे. फक्त नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचाच गौरव होतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यात त्यागाची भावना रुजली आहे. चळवळीत एकमेकांच्या कामाचे मोजमाप केले जात नाही. प्रत्येकाने शक्‍य तितका वेळ चळवळीसाठी द्यावा, एवढीच अपेक्षा ठेवली जाते. चळवळीची उभारणी समान न्याय तत्त्वावर झाली आहे. अगदी कार्यक्रमातही व्यासपीठावर फक्त प्रमुख पाहुण्यांची खुर्ची असते. सरपंचांसह सर्वच मान्यवर व्यासपीठासमोरील खुर्चीवर बसतात. त्यामुळे आपण सारे एक, हा विचार पक्का झाला आहे. चळवळीत ‘मी’ ऐवजी ‘आम्ही’ या शब्दाला महत्त्व आहे आणि तोच आत्मा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने हा आत्मा सांभाळला आहे.

गावात २९ ऑक्‍टोबर २०१२ ला चळवळीची सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आईचे निधन झाले. आम्ही नातेवाइकांनी नेत्रदानाचा निर्णय घेतला. गेल्या सहा वर्षांत २४ वे नेत्रदान झाले. शेजारील गावातही चळवळ रुजल्यामुळे तेथूनही नेत्रदान होत आहे.
- जयसिंग पाटील,
पहिल्या नेत्रदात्या कै. पद्मावती पाटील यांचे चिरंजीव

डॉ. सदानंद पाटणे यांचे सहकार्य
चळवळीला गडहिंग्लज येथील अंकुर आय हॉस्पिटलचे डॉ. सदानंद पाटणे यांचे मोलाचे सहकार्य आहे. मृत व्यक्तीचे नेत्रदान घेण्याची तांत्रिक जबाबदारी डॉ. पाटणे व त्यांचे तज्ज्ञ पथक पार पाडते. अंकुर हॉस्पिटलमध्ये शासनाने आय रिट्रायव्हल सेंटरही मंजूर केले आहेत. प्रसंगी व्यवसायाकडे दुर्लक्ष करून डॉ. पाटणे यांनी तोलामोलाची साथ या चळवळीला दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com