खेराडे-वांगीत म्हणून पोलिसांचा सक्त पहारा 

1Corona_Danger_19.jpg
1Corona_Danger_19.jpg


कडेगाव : मुंबई येथे मृत झाल्यानंतर खेराडे-वांगी (ता. कडेगाव) येथे अंत्यसंस्कार झालेल्या तरुणाच्या संपर्कातील 30 जणांचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. 


खेराडे-वांगी येथील तरुणाचा मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये शनिवारी (ता.18) हृदयविकाराने मृत्यू झाला होता. संबंधित हॉस्पिटलने त्याबाबत मृत्यू प्रमाणपत्र नातेवाईकांना दिले. तसेच खबरदारी म्हणून मृत्यूनंतर स्वॅबचे नमुने घेतले होते. मृताचे मूळ गाव खेराडे-वांगी आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीने मृतदेह खेराडे-वांगी येथे शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी आणून दिला. त्यानंतर लगेच मृताची पत्नी मुंबईला गेली. तर बुधवारी (ता.22) मृत तरुणाला "कोरोना' झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खेराडे-वांगी गावासह तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली. 


पोलिस प्रशासनाने तत्काळ गाव "लॉक' केले. तसेच प्रशासनाने मृत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्यांची माहिती संकलित केली. काल गुरुवारी सकाळी संपर्कातील 30 व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक क्वारंटाईन केले. त्यांच्या "स्वॅब' चे नमुने घेऊन ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. संबंधित सर्वांचा अहवाल "निगेटिव्ह' असल्याचे समजले. त्यामुळे 30 जणांसह त्यांचे नातेवाईक आणि सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. 


दरम्यान मृत तरुणाची पत्नी आणि शववाहिका चालक यांना मुंबईतील आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तर मृत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या 30 जणांचे "स्वॅब' चे नमुने निगेटिव्ह आले असले तरी त्यांना 14 दिवस कडेगाव येथील शासकीय वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन म्हणून रहावे लागणार आहे. तसेच या कालावधीत आरोग्य विभागाकडून आणखी दोन वेळा त्यांच्या घशातील "स्वॅब' चे नमुने घेऊन ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. 

तर आरोग्य विभागाने त्या तरुणाच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची माहिती घेण्यास सुरवात केली असून त्यांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तसेच गावांतील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे आज दुसऱ्या दिवशीही सुरू होता. तर अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या गावांतील आणखी दोघांना आज आरोग्य विभागाने संस्थात्मक क्वारंटाईन केले. तर अजूनही येथे संस्थात्मक क्वारंटाईन आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 

तर पोलिस प्रशासनाच्या वतीने आज दुसऱ्या दिवशीही खेराडे वांगी गावात चोख पहारा ठेवला होता. तर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. त्यामुळे संपूर्ण गावात दिवसभर शुकशुकाट होता. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी खेराडे वांगी गावाला भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. 

आणखी दोघांना केले संस्थात्मक क्वारंटाईन 

खेराडे वांगीतील "त्या' तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या गावातील आणखी दोघांना आज आरोग्य विभागाने संस्थात्मक क्वारंटाईन केले. त्यांच्या घशातील "स्वॅब' चे नमुने घेऊन ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील क्वारंटाईनचा आकडा आज 32 वर पोहोचला. 

म्हणून चौघाना केले सक्तीने क्वारंटाईन 

मुंबई येथे मृत्यू झालेल्या "त्या' तरुणाचा मृतदेह शववाहिकेतून खेराडे वांगी येथे नेला जाणार असल्याची माहिती मुंबईस्थित खेराडे वांगी येथील अन्य चौघांना लागली. त्याचा गैरफायदा घेत चौघेजण "त्या' तरुणाच्या शववाहिकेच्या पाठीमागून कारमधून संचारबंदीचा भंग करून मुंबईहून खेराडे वांगीत दाखल झाले. याची माहिती तालुका प्रशासनास मिळताच संचारबंदीचा भंग करून येथे आलेल्या चौघांना प्रशासनाने सक्तीने संस्थात्मक क्वारंटाईन केले. तर आता त्यांच्यावर संचारबंदीचा भंग करून मुंबईहून खेराडे वांगीत दाखल झाल्याबद्दल गुन्हाही दाखल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com