कऱ्हाड : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना करण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले, मात्र त्यावर अद्यापही ताकदीने काम होणे अपेक्षीत आहे. समित्या अॅक्टीव्ह असल्याचे केवळ कागदोपत्री घोडी नाचवली जात आहेत.
मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी सुरक्षा समितीचे काम गतीत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचे अस्तीत्व केवळ कागदावरच दिसते आहे. जिल्ह्यातील सुमारे 865 शाळा, महाविद्यालयापैकी केवळ 214 शाळेत समित्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 651 शाळा, माहिविद्यालये अद्यापही समित्याविना आहेत. जेथे समित्या आहेत, तेथील काही मोजक्याच समित्या सक्रीय आहेत. जिल्ह्यात कऱ्हाड व फलटण तालुक्यात सर्वाधिक ४५ व जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात केवळ दोन, जावळी तालुक्यात केवळ तीन तर माण तालुक्यात केवळ सात समित्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या जिल्हा पोलिस दलात केवळ गप्पा रंगल्याचे दिसते. वरिष्ठांच्या समिती स्थापण्याच्या हेतूलाच प्रत्यक्षात पोलिसांनीच बगल दिली आहे.
विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी यांच्या सुरक्षेसह त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी व त्यांच्याशी सुसंवाद साधता यावा, या हेतूने प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत प्रत्येक माध्यमिक शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आले. त्या आदेशानुसार प्रत्यक्ष त्या समित्यांवर काहीच काम झालेले नाही. जिल्ह्यात 29 पोलिस ठाण्यापैकी काही मोजक्याच ठिकाणी समित्या आहेत. मोठ्या पोलिस ठाण्यातही त्या उपक्रमाला काहीच प्रतिसाद दिलेला नाही. परिणामी ती योजना केवळ कागदावरच राहिल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात 22 पोलिस ठाणी अशी आहेत, ज्यांच्याकडे दहापेक्षा कमी समित्या आहेत. कोयनानगर, पाचगणी, महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तर केवळ एकच समिती आहे. सातारा शहर, शाहपूरी, बोरगाव, कऱ्हाड तालुका, तळबीड, वाई, मेढा, भुंईंज, कोरेगाव, पुसेगाव, रहिमतपूर, वाठार, वडूज, दहीवडी, म्हसवड, औंध, लोणंद, खंडाळा, शिरवळ येथील पोलिसांनी समिती स्थापन करताना एकचा आकडा ओंलांडला असला तरी ते दहापेक्षा कमी आहेत. कऱ्हाड व फलटण शहर पोलिस ठाण्यात 25, फलटण तालुका 20 पोलिस ठाण्यात सर्वाधिक समित्या आहेत.
जिल्ह्यात माध्यमिक शाळा 724 व उच्च माध्यमिक शळा 113 व कॉलेज 38 आहेत. प्रत्येक शाळेत समिती अत्यावश्यक आहे. मात्र त्यातील सुमारे 651 ठिकाणी समितीच नाही. जेथे समित्या आहेत. त्यांचे काम कागदावर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयातील मुलीना होणार त्रास पोलिसांपर्यंत पोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुका 137, कऱ्हाड 132, फलटण, पाटण व खटावला 80, माणला 75 तर कोरेगावला 71 माध्यमिक शाळा व महाविद्यालये आहेत. तेथे समित्यांची अवस्था केविलवाणी आहे. कऱ्हाड व फलटण तालुक्यात 45 समित्या आहेत. सातारला 32 समित्या कार्यरत आहेत. पाटणला 22, खटावला 16 तर माण तालुक्यात 7 समित्या कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्याने समिती स्थापन करण्य़ावर गांभीर्याने काम केले नसल्याने ही स्थिती दिसते आहे.
तालुका निहाय स्थिती
तालुका पोलिस ठाण्यांची संख्या शाळा, महाविद्यालय संख्या समितीची संख्या
सातारा चार 137 32
कऱ्हाड चार 132 45
जावळी एक 38 तीन
खंडाळा तीन 37 16
खटाव तीन 80 16
कोरेगाव तीन 71 15
महाबळेश्वर दोन 51 दोन
माण दोन 75 सात
पाटण तीन 84 22
फलटण दोन 80 45
वाई दोन 53 11
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.