सावकारांच्या तगाद्याने मुलाची आत्महत्या

सावकारांच्या तगाद्याने मुलाची आत्महत्या

सांगली - खासगी सावकारांनी पैशासाठी तगादा लावून शिवाजी तुकाराम कदम (वय ३१, घाणंद, ता. आटपाडी) यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध आज विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला. कदम याने ५ मार्चला भारती हॉस्पिटलमागे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून वडील तुकाराम नामदेव कदम (वय ६०, घाणंद) यांनी फिर्याद दिली आहे.

संशयित तुकाराम कोहिनकर, पांडुरंग किसन कोहिनकर, दादा दाभाडे (तळेगाव, पुणे), धनाजी गायकवाड (बिजलीनगर, पुणे), पांडुरंग (पूर्ण नाव नाही, रा. कवठेमहांकाळ), दिनेश ससाणे (सोलापूर), राजू हातकणंगले, राणी हातकणंगलेकर, रेचल नायर, रवी नायर, अजय नायर (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अकरा जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. उशिरापर्यंत कोणासही  अटक करण्यात आली नव्हती.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी - कदम पाच वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुणे येथे होता. तेथे त्याची एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी प्रेमविवाह  केला. या आंतरजातीय प्रेमविवाहास तरुणीच्या नातेवाईकांनी विरोध केला. त्याला दमदाटीही केली. 

त्यामुळे शिवाजी सांगलीत राहण्यास आला. सांगलीत येण्यापूर्वी तो काही काळ उस्मानाबाद येथे होता. पुणे आणि उस्मानाबाद येथे खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. पैसे परतफेड केल्यानंतरही सावकारांनी  तगादा लावला होता. सावकारांनी कर्जापोटी घेतलेले धनादेश बॅंकेत दिले होते. ते वठले नव्हते. त्यामुळे शिवाजीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता.

पैसे वसुलीसाठी सावकारांनी वारंवार तगादा लावला  होता. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.  सांगलीत राजू हातकणंगले, राणी हातकणंगलेकर, रेचल नायर, रवी नायर, अजय नायर यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजीला काठ्यांनी मारहाण करून जखमी केले होते. मारहाण आणि पैशाच्या तगादा, जीवे मारण्याची धमकी यामुळे शिवाजीला शारीरिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात झाला. तशातच पत्नीही सोडून गेली.

सावकारांविरुद्ध पोलिसांकडे जाऊन तक्रार सांगितली;  परंतु तक्रार घेतली गेली नाही. त्याने पाच मार्चला भारती हॉस्पिटलच्या मागे रेल्वेखाली उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत  त्याने सर्वांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. चिठ्ठीवरून वडील तुकाराम कदम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अकरा जणांवर गुन्हा नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com