कालव्यात पोहणे नेहमी असुरक्षित असते.
कालव्यात पोहणे नेहमी असुरक्षित असते.

सुरक्षित पोहण्याचा व्हावा जागर

नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना पोहण्याबाबत मार्गदर्शनासह काळजीचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

तारळी नदीपात्रात लहान भावाला वाचविताना थोरल्याला प्राणास मुकावे लागले, तर पाण्याचा अंदाज न आल्याने कोयना नदीपात्रात युवकाचा बडून मृत्यू झाला. मुळीकवाडी (ता. सातारा) येथे विहिरीत दोन सख्या भावंडासह चौघे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. अशा अनेक विदारक घटना कृष्णा, कोयना, नीरा, तारळी, वसना नदी, कण्हेर, तारळी, कास, वेण्णा जलाशयात तसेच कॅनॉल, विहिरी, शेततळे, तलावांमध्ये घडल्या आहेत. 

कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, उष्मा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पोहण्याला पसंती देतात. शहरांतील लोक बहुतेक वेळी स्वीमिंग पूल किंवा सुटीवर गेल्यास तलाव किंवा समुद्रामध्ये डुंबणे पसंत करतात, तर गावाकडे राहणाऱ्या लोकांना नदी, विहिरी किंवा तलावामध्ये पोहण्याची मजा लुटता येते; पण त्या आनंदास अनेकदा गालबोट लागत असते.

पोहताना अकस्मात बुडून मृत्यू पावल्याच्या बातम्या सातत्याने ऐकण्यास मिळतात. सगळ्याच नद्या किंवा तलाव, किंवा समुद्रकिनारे पोहण्यासाठी सुरक्षित असतील असे नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरण्याआधी त्या ठिकाणाची माहिती करून घ्यावी. तेथील पाण्याचा प्रवाह कितपत वेगवान आहे, पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे धोकादायक जीव आहेत, हे माहिती असणे आवश्‍यक आहे. 

लाईफ जॅकेट हवे
बडून मृत्यू होण्यात शालेय मुले, युवकांचे प्रमाण जास्त आहे. नदीकाठी, शेतामध्ये गेल्यानंतर लहान मुले पालकांना न माहिती देता पोहण्यास जातात. पोहता येत नसल्याने ते बुडतात, तर अनेक युवक फिरण्यासाठी धरण, समुद्राकाठी जातात. पोहता येत नसतानाही आततायीपणा करून खोलपात्रात जातात. त्यामुळे बुडून मृत्यू होतात. ते टाळण्यासाठी लहान मुलांवर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मुलांना विश्‍वासात घेऊन त्यांच्यासमवेत पोहण्यास गेले पाहिजे. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लाइफ जॅकेट किंवा पोहोताना दमलात तर पाण्यावर तरंगण्यासाठी सहायक ठरेल अशी साधने घेतली पाहिजेत. लाइफ जाकेट घालूनच मुलांना पोहण्यास शिकवायला हवे. 

अनुभवी पोहणारा हवा
अनोळखी ठिकाणी पोहोण्यास उतरणार असाल, तर सजग राहणे आवश्‍यक आहे. पाण्याचा प्रवाह आणि पाण्याच्या पातळीखालील प्रवाह कसे, कोणत्या दिशेला आहेत आणि कितपत वेगवान आहेत, याचा अंदाज घ्यायला हवा. नदीपात्रात जलपर्णी, शेवाळे असले, तर त्या भागामध्ये पोहणे धोकादायक ठरणारे आहे. जलपर्णी शरीरासाठी घातक ठरू शकतात. तसेच शेवाळ्यामुळे अंगावर पुरळ येऊ शकते, डोळ्यांमध्ये इन्फेक्‍शन होऊ शकते. जेमतेम पोहण्यास येणाऱ्यांनी अनुभवी, पोहोण्यात तरबेज असलेली व्यक्ती आपल्यासोबत असल्याशिवाय पोहोण्यास उतरू नये. तसेच जलतरण तलावांत जीवरक्षक असणे अत्यंत आवश्‍यक आहे.

हे करा...
  शिकताना लाइफ जॅकेटचा वापर करा
  पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या
  उंचीवरून उड्या मारणे टाळा
  पोहण्यास उतरताना मद्यपान करणे टाळा
  जलपर्णी, शेवाळे असेल तर पोहू नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com