टीईटीतून शासनाला 91.63 कोटी : पाच वर्षांनंतर एकालाही नोकरी नाही
सोलापूर - घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाला बगल देत आई- वडिलांच्या इच्छेनुसार गुरुजी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या व टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना मागील पाच वर्षांपासून नोकरीसाठी प्रतीक्षाच करावी लागतेय. शिक्षक भरतीपूर्व परीक्षेच्या माध्यमातून सरकारला 91 कोटी 63 लाख मिळाले. परंतु, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकालाही मागील चार-पाच वर्षांत नोकरी मिळाली नाही.
बारावीनंतर डीएड उत्तीर्ण झालेल्या भावी गुरुजींसाठी सरकारने 2013 पासून टीईटी परीक्षेची अट घातली. त्यानंतर 2016 वगळता दरवर्षी टीईटीची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातील 18 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिवला. नोकरीची वाट पाहत असलेल्या काही भावी गुरुजींचे वय संपुष्टात आले, तर काहींनी रोजगार हमी अथवा स्वंयरोजगार स्वीकारला. सरकारच आता खासगी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती करणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याकरिता पवित्र पोर्टल खुले केले मात्र त्यातून अर्ज भरताना माहिती अचूक असूनही मिसमॅच अथवा एररचे अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे भावी गुरुजींची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.
असे आहे चित्र (2013-18)
परीक्षा दिलेले विद्यार्थी 18,32,568
परीक्षेच्या माध्यमातून जमा फी 91.63 कोटी
परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी 70,026
पात्र विद्यार्थ्यांना नोकरी 00
आई- वडिलांच्या इच्छेनुसार परिस्थितीची जाणीव ठेवून बारावीला 75 टक्के गुण मिळविले. डी.एड. मध्ये 74 टक्के, तर शिक्षक भरतीपूर्व परीक्षेतही 73 टक्के गुण मिळविले. आता मुलाचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास आई-वडिलांना होता. मात्र, मागील पाच वर्षांत शिक्षक भरतीच निघाली नाही.
- सीताराम गावडे, टेट उत्तीर्ण विद्यार्थी
|