मोडनिंब - चारा व पाण्याच्या शोधात असणाऱ्या दोन हरणांचा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याने मृत्यू झाला, तर विहिरीत पडून एक काळवीट जखमी झाले. दोन दिवसांत माढा तालुक्यात या घटना घडल्या आहेत.
वनविभागाने तातडीने पाणवठ्यात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.
माढा तालुक्यात भेंड, पडसाळी, तुळशी, वडाचीवाडी उपळाई या गाव परिसरात वन विभागाचे क्षेत्र मोठे आहे. हरिण, काळवीट हजारोंच्या संख्येने आहेत. लांडगे, मोर, ससे, खोकड, रानमांजरे, घुबड यांचाही समावेश आहे.
आता या वन्य जिवांची भटकंती सुरू आहे. पावसाळा संपत आला तरी अध्याप पाऊस न पडल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. वन्यजीवांची चारा आणि पाण्याच्या शोधासाठी भटकंती सुरू झाली आहे. हरिण, काळवीट हे प्राणी मानवी वसाहती परिसरात येऊ लागले आहेत. परिणामी त्यांना जीव गमवावा लागत आहे. उपळाई खुर्द येथील नीतू कदम यांच्या शेतात व जाधववाडी (मोडनिंब) येथील हरी जाधव यांच्या शेतात कुत्र्यांनी हल्ला केल्याने दोन हरणांचा मृत्यू झाला, तर अरण येथील दीपक कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत पडून काळवीट जखमी झाले.
|