कोरेगाव (जि. सातारा) : जिल्हा आपल्या ताब्यात घ्यायचा असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर शशिकांत शिंदेंना थांबवलेच पाहिजे, या हेतूने उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक सोडली आणि कोरेगावात येऊन विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे कोणत्याही परिस्थितीत पराभूत झालेच पाहिजेत, अशी भूमिका घेतली. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, एका पराभवाने मी थांबणारा नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात पुन्हा पक्षसंघटना बांधणार आहे आणि राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्यच ठेवणार आहे, अशी ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.
ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील निवासस्थानी झालेल्या कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शशिकांत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, "शरद पवार यांचे जिल्ह्यात झालेले मेळावे आणि भरपावसातील सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर ताकद लावली. त्यांनी मेगा भरतीमध्ये सातारा जिल्ह्यातून जास्त इनकमिंग करून घेतले. परंतु, कोरेगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. त्यामुळे विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर केला.
शिवसेनेचा उमेदवार असून देखील भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि स्वत: भाजपचे कार्यकर्ते लढत होते. याचाच अर्थ भाजपला विधिमंडळामध्ये शशिकांत शिंदे यांचा आवाज दाबायचा होता. त्यांना सरकारच्या विरोधात बोलणारे नको होते. त्यामुळे त्यांनी व्यूहरचना करून आपल्याला पराभूत केले. "केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या पद्धतीने पराभूत केले, तोच प्रयोग भाजपने महाराष्ट्रात केला आणि त्यातूनच आपला पराभव झाला', असा आरोप शिंदे यांनी केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप विधाते, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव महाडिक, सतीश चव्हाण, बाळासाहेब जाधव, अरुण माने, भास्कर कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणांतून विरोधकांनी खेळलेले घाणेरडे राजकारण, धनशक्तीचा अमाप वापर याबद्दलची उदाहरणे दिली. श्रीमंत नि. झांजुर्णे यांनी आभार मानले.
माझ्याच पराभवासाठी ताकद
उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक सोडली आणि कोरेगावात येऊन विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे कोणत्याही परिस्थितीत पराभूत झालेच पाहिजेत, अशी भूमिका घेतली. त्यांच्यासह राज्यातील भाजपच्या सर्वच नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर ताकद लावली. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.