नगर - बहुचर्चित कोपर्डी अत्याचार व खूनखटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती झाली. तसा आदेश नुकताच विधी व न्याय विभागाने काढला आहे.
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खूनखटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयात सरकारतर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. आरोपींनी शिक्षेविरोधात औरंगाबाद खंडपीठात अपील केले; तसेच राज्य सरकारनेही फाशीची शिक्षा कायम होण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात कोपर्डी खटल्याची बाजू मांडण्यासाठी ऍड. उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी विधी व न्याय विभागाकडे पाठविला होता. त्यास अनुसरून विधी व न्याय विभागाने ऍड. उमेशचंद्र यादव यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. शिक्षेविरोधात आरोपीतर्फे दाखल अपिलाविरुद्ध आणि शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या अर्जावर ऍड. यादव बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, राज्यातील बहुचर्चित जवखेडे हत्याकांड खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात सरकारतर्फे ऍड. उमेशचंद्र यादव बाजू मांडत आहेत.
|