Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेची हॅट्‌ट्रिक की काँग्रेसला बळ

Vidhan Sabha 2019 : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेची हॅट्‌ट्रिक की काँग्रेसला बळ

कोल्हापूर - बदलत्या राजकारणात कोल्हापूर उत्तरचा भावी आमदार कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे. ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिणचा बालेकिल्ला सर करण्याचे ठरविले आहे. मधुरिमाराजे यांनी न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोरील अडचणी निवडणुकीपूर्वीच कमी झाल्या आहेत. युती होणार असल्याने आमदार होण्याच्या अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे.

२००४ चा मालोजीराजे यांचा काँग्रेसकडून अपवाद वगळता शहर मतदारसंघाने शिवसेनेला साथ दिली आहे. दिलीप देसाई नंतर सुरेश साळोखे यांना दोनवेळा आणि आता राजेश क्षीरसागर हे दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या अकराव्या फेरीपासून शिवसेनेचे मताधिक्‍य वाढत जाते ते शेवटच्या फेरीपर्यंत कमी होत नाही असा अनुभव आहे. कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने पहिल्या तीन फेऱ्यात शिवसेनेला ताकद मिळते. शाहूपुरी, रविवार पेठ, शिवाजी उद्यमनगर, बाजारगेट, शनिवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, दुधाळी, शिवाजी पेठ, गंजीमाळ परिसर, मंगळवार पेठ, यादवनगर, राजारामपुरी हा परिसर कायम सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असलेला प्रभाव आजही कायम आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडुकीत आमदार क्षीरसागर यांच्यासमोरील प्रमूख प्रतिस्पर्धी होते ते आमदार सतेज पाटील यांचे पुतणे अथवा मधुरिमाराजे छत्रपती. ऋतुराज शिवसेनेकडून लढतील अशीच चिन्हे होती. मात्र, कोल्हापूर दक्षिणच पाटील यांनी हक्काचा मतदारसंघ निवडल्याने त्यांनी ऋतुराज यास तेथून उतरविण्याचा निर्णय घेतला. मधुरिमाराजे यांचे नाव भाजपकडून सातत्याने चर्चेत आले. मात्र, राजघराण्यातील कुणीही निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी रिंगणात नसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने क्षीरसागर यांचा शिवसेनेकडून मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. मध्यंतरी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल की नाही याची चर्चा सुरू झाली. मात्र, काही दिवसात राजकारणाचे संदर्भ बदलून गेले. कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ असल्याने तो न सोडण्याची शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका असणार आहे. युती न झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव  तयारीत होते. काँग्रेसकडून दौलत देसाई यांचा उमेदवारीचा दावा प्रबळ आहे. दोन्ही काँग्रेसचे उमेदवार ते असतील. त्यामुळे शिवसेना विरूद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची शक्‍यता आहे. क्षीरसागर यांची हॅट्‌ट्रिक होणार की २००४ च्या निवडणुकीची पुनर्रावृत्ती होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

कसबा बावडा यावेळी कुणाला साथ देतो हे ही महत्त्‍वाचे आहे. सतेज पाटील यांच्या मागे हा परिसर राहिला आहे. त्यांचे पुतणे दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकीटावर लढत असल्याने त्यांना अन्य कोणतीही भूमिका घेणे शक्‍य नाही. बावड्याने तर सेनेला साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी सुमारे पावणेआठ हजारांचे मताधिक्‍य या परिसरातून मिळाले. 

२०१४ चे मतदान
  राजेश क्षीरसागर(शिवसेना) - ६९७३६
  सत्यजित कदम(काँग्रेस) - ४७३१५
  महेश जाधव(भाजप) - ४४१०४

२००९ चे मतदान
  राजेश क्षीरसागर (शिवसेना) - ७०१२९
  छत्रपती मालोजीराजे (काँग्रेस) - ६६४४२
  रामभाऊ चव्हाण (जनसुराज्य) - ५३९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com