Vidhansabha 2019 : शिराळा, जतविषयी भाजपला चिंता

Vidhansabha 2019 : शिराळा, जतविषयी भाजपला चिंता

सांगली - अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचे वरिष्ठ पातळीवरून एक सर्वेक्षण झाले आहे. त्यात शिराळा, जत विधानसभा मतदार संघांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या दोन मतदारसंघातील स्थिती पक्षासाठी फारशी चांगली नसल्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळत आहेत. त्यात सुधारणा करण्यासाठी दोन्ही आमदारांशी पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करतील, असे सांगण्यात आले. जतमधील गटबाजीवरही भाजप गांभीर्याने विचार करत आहे.

भाजपने राज्यात २२० पेक्षा जास्त जागांवर विजयासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने मांडणी करत विजयाची  हमी असलेले नेते पक्षात घेण्याचा धडाका लावला आहे. हा सारा खेळ अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या एका सविस्तर सर्वेक्षणाचा भाग आहे. सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांवर भाजपचे बारकाईने लक्ष आहे.

पैकी मिरज, जत, सांगली आणि शिराळा येथे भाजपचे, खानापूरमध्ये शिवसेनेचे, तर तासगाव आणि इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार  आहेत. पलूस-कडेगाव एकमेव मतदार संघ काँग्रेसकडे आहे. येथील आठही मतदारसंघात युतीला संधी मिळू शकते, असा भाजपचा विश्‍वास आहे. त्यादृष्टीने हातात नसलेल्या मतदार संघांची चाचपणी करतानाच पक्षाने हातातील मतदारसंघ सुरक्षित आहेत का, याचाही  अभ्यास केला आहे. त्यात जत आणि शिराळ्याविषयी चिंता व्यक्त झाली आहे.

शिराळा मतदार संघात शिवाजीराव नाईक आमदार  आहेत. त्यांना मंत्रिपदी संधीही मिळू शकली असती, मात्र पक्षाने त्यांचा विचार केलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांना पक्षात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. तेथे नाईक अधिक देशमुख अशी बेरीज हेच विजयाचे समीकरण ठरत आले आहे. गेल्या निवडणुकीत नाईक विरुद्ध नाईक विरुद्ध देशमुख अशी तिरंगी लढत होती. त्यात शिवाजीराव  नाईक विजयी झाले. यावेळी युती झाल्यास मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांची एकत्रित ताकद शिवाजीरावांवर भारी ठरू शकते, असा आदमास  भाजपला आहे. त्यामुळे सत्यजित यांना प्रवेशासाठी गळ घातली जात आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांना उघड ऑफर होती. 

जत मतदारसंघात भाजपांतर्गत गुंता वाढला आहे. आमदार विलासराव जगताप यांच्याविरोधकांनी रान तापवायला सुरवात केली आहे. त्यात जिल्हा परिषद आरोग्य सभापती तम्मनगौडा रविपाटील, डॉ. रवींद्र आरळी आणि बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचा समावेश आहे. श्री. जमदाडे यांनी उघड विरोधाची भूमिका घेतली नसली तर ‘आता मीच’, असा निर्धार केला आहे. भाजप अशी तुकड्यात विखुरल्यास विरोधकांना संधी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डॅमेज कंट्रोल कसे?
भाजपने या घडीला पदवीधर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी नावनोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी विधानसभा मतदारसंघातील डॅमेज कंट्रोल करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष नेतृत्वाचा कस लागला होता. विधानसभेलाही तीच स्थिती असेल, अशी चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com