राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बुरजांची बांधणी!

NCP
NCP

सातारा - लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बालेकिल्ल्याच्या बुरजांची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून हाती घेतले जाणार आहे. संघटनात्मक बांधणीसोबतच गावागावांत जाऊन लोकांमध्ये पक्षाबाबत विश्‍वास निर्माण करण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून खिंडार पाडण्याचा प्रयोग यशस्वी होण्याची भीती आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे आमदार आतापासूनच रणनीती आखून वाटचाल करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी व काँग्रेसने परिवर्तन घडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, शेवटी मतदारराजाने मोदींच्या पारड्यात यश टाकले. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार काय करतील, याची धास्ती आता राष्ट्रवादीच्या नेत्यांत निर्माण झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सव्वालाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. परंतु, मागील वेळच्या मताधिक्‍यात तब्बल सव्वादोन लाखांचा फरक पडला आहे. पण, उदयनराजेंच्या वैयक्तिक मतांमध्येही वाढ झाली आहे. ही वाढ पक्षाच्या आमदारांनी पक्षनिष्ठा व शरद पवारांबाबत दाखविलेल्या प्रेमातूनच दिसली.

आता लोकसभेनंतर विधानसभेच्या रणधुमाळीसाठी प्रत्येक आमदाराला आपापला बुरूज शाबूत ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. कारण लोकसभेपूर्वीपासूनच भाजपमधील काही इच्छुकांनी बांधणी सुरू केली आहे.

ही बांधणी करताना त्यांना भाजपच्या बूथनिहाय बांधणीचा फायदा होणार आहे. त्यामुळे बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना सावध राहूनच वाटचाल करावी लागेल. मतदारराजा कोणाला धक्का देईल, हे या लोकसभेच्या निकालाने दाखवून दिलेले आहे. यातून बोध घेऊन राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेसाठी बालेकिल्ल्याच्या बुरूजांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावांत जाऊन राष्ट्रवादी पक्षाविषयी मतदारांत विश्‍वास निर्माण करण्याचे काम होणार आहे. सध्या राष्ट्रवादीचे पाचही आमदार सक्षम आणि पुन्हा निवडून येण्यासारखी परिस्थिती असली तरी विरोधकांबाबत गाफील राहून वाटचाल करणे सध्याच्या परिस्थितीत सोपे नाही. यावेळेस भाजपकडून सर्व अस्त्रे वापरली जाऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे काम होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला वरवर सोपे वाटत असले तरी आतून भाजप, शिवसेना बालेकिल्ला पोखरत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला संपर्क अभियान राबवून प्रत्येक मतदाराला विश्‍वास द्यावा लागणार आहे. अन्यथा हाच मतदार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मोदी आणि फडणवीस लाटेत वाहून जाऊ शकतो. साताऱ्यात राष्ट्रवादी पुन्हा...हे सहज शक्‍य असले तरी काही ठिकाणी भाजपकडून धक्कातंत्र अवलंबले जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाचही आमदार आता सावध राहून वाटचाल करत विधानसभेसाठी तळागाळातून बांधणी करण्यास सुरवात करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com