पाण्यासाठी सातारकर रस्त्यावर

सातारा - पाणी गळती काढण्याच्या कामावरून जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेताना खासदार उदयनराजे भोसले.
सातारा - पाणी गळती काढण्याच्या कामावरून जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेताना खासदार उदयनराजे भोसले.

सातारा - अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेले सातारकर आज रस्त्यावर उतरले. त्यांनी राधिका चौक तसेच करंजे नाका येथे ‘रास्तो रोको’ केल्याने एक तास वाहतूक विस्कळित झाली होती. पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

येथील प्रतापगंज पेठ तसेच करंजे नाका परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत नागरिकांनी पालिका व जीवन प्राधिकरणाकडे तक्रारीही केल्या होत्या. तरीही पाण्याचा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे नामदेवनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी दहाच्या सुमारास राधिका चौकामध्ये पाण्याची भांडी रस्त्यावर मांडून ‘रास्ता रोको’ केला.

सुमारे अर्धा तास हा रास्ता रोको सुरू होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली होती. या आंदोलनाची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

हे आंदोलन संपवून पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी सुस्कारा टाकतात तोच करंजे नाका परिसरातील निसर्ग कॉलनी व स्वरूप विहार कॉलनीतील नागरिकांनी करंजे नाका परिसरात रास्ता रोको केला. येथील नागरिकांनाही आठ दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर शाहूपुरी पोलिस तत्काळ करंजे नाका परिसरात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ पालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी तेथे आले. तसेच जीवन प्राधिकरणाचे अधिकारीही आले. त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले तेथे आले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत तातडीने कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

उदयनराजेंनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर
करंजे नाका येथे उदयनराजे आल्यानंतर नागरिकांनी जीवन प्राधिकरणाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. अनेकदा तक्रारी करूनही काम होत नाही, अधिकारी प्रतिसाद देत नाहीत, काय करायचे, असा सवाल नागरिकांनी उदयनराजेंना केला. त्यामुळे उदयनराजेंनीही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. नागरिक एवढे चिडलेत, मार खाल्ल्यानंतर कामे करणार का? शहरामध्ये ग्रेड सेपरेटर, भुयारी गटार योजनेची कामे चालू आहेत. एवढी मोठी कामे चालू असताना पाणीपुरवठ्याच्या पाइपना धक्का लागण्याची शक्‍यता असते. मात्र, गळती काढण्याची कामे तातडीने झाली पाहिजेत. तुमच्या घरात पाणी आले नाही तर काय केले असते, याचाही विचार करा. तरीही कळत नसेल तर, तुमच्या डोक्‍यात घागर मारायची, का माझ्या डोक्‍यात हे सांगा. यापुढे हलगर्जीपणा झाला, तर समजून घेणार नाही, असा दम उदयनराजेंनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने गळती काढण्याच्या कामाला सुरवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com