यंदा राज्यात १०७ लाख टन साखर उत्पादन

यंदा राज्यात १०७ लाख टन साखर उत्पादन

कोल्हापूर - कमी पाऊस, दुष्काळ आदी कारणांनी यावर्षीचे साखर उत्पादन घटण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तवली होती, तथापि गेल्यावर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षी गाळप आणि साखर उत्पादनही जास्त झाले आहे. गेल्यावर्षी १०६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते, यंदा ते १०७ लाख टन झाले आहे.

दरम्यान, राज्यातील साखर हंगामाची सांगता झाली असून आता कारखानदारांसमोर पुढील हंगाम सुरू करण्यापेक्षा या हंगामातील उर्वरित एफआरपी देण्याचे ‘टेन्शन’ आहे. यावर्षीचा हिशेब पूर्ण झाला, तरच पुढील हंगामात कारखाने सुरू होतील, अशी परिस्थिती आहे. साखर उत्पादन आणि गाळपात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागानेच बाजी मारली आहे.

गेल्या हंगामात राज्यातील १८७ कारखान्यांनी हंगाम घेऊन ९५०.६९ लाख टन ऊस गाळप करून १०६.७ लाख टन साखर उत्पादन केले होते. नुकत्याच संपलेल्या हंगामात १९५ कारखान्यांनी ९५१.७९ लाख टन ऊस गाळप करून १०७.९ टन साखर उत्पादन केले. राज्याचा सरासरी उतारा ११.२६ तर कोल्हापूर विभागाचा उतारा १२.३८ आहे. कोल्हापूर विभागात २६ सहकारी व १२ खासगी अशा ३८ कारखान्यांनी हंगाम घेतला. विभागातील दोन जिल्ह्यांत मिळून २१५.९९ लाख टन ऊस गाळप तर २६७.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

गेल्यावर्षी एवढेच साखर उत्पादन झाले असले तरी बाजारात साखरेचा उठाव नाही. महाराष्ट्राची बाजारपेठ असलेल्या राज्यात उत्तरप्रदेशने कब्जा केला आहे. त्यामुळे राज्यातील साखरेचा उठाव नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर गडगडले असल्याने बॅंका आपल्या ताब्यातील साखर कमी दराने सोडण्यास तयार नाही. अशा विचित्र परिस्थितीत यावर्षी साखर उद्योग सापडला आहे. सद्यस्थितीत अनेक कारखान्यांच्या गोदामाबाहेर उघड्यावर साखरेचे साठे आहेत. दोन महिन्यांत या साखरेचा उठाव झाला नाही तर या उद्योगाची आर्थिक कोंडी निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com