सोलापूर - देशाच्या व राज्याच्या सत्तेवर जातीयवादी पक्ष बसले आहेत. त्यांना दूर करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आवाज सर्वांनी ऐकायला हवा, असे आवाहन लोकतांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील एका कार्यक्रमासाठी सोलापुरात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्यातील सगळ्या विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. युतीला हरविण्यासाठी सगळेच एक झाले, तर ते देतील तेवढ्या जागा लढविण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीची स्थापना केली आहे.
त्यादृष्टीने सर्वांनीच एकत्रपणे प्रयत्न करायला हवा. समाजवादाची सत्ता मोडीत काढण्यासाठी भांडवलदार शक्ती कार्यरत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले आहे. मात्र, ते आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी सरकारला शिकस्त करावी लागेल. मागील सरकारने राणे समिती नेमली होती. पण, या सरकारने मागासवर्गीय समितीचा अहवाल घेऊन आरक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
|