ऐन दिवाळीत स्वस्त धान्य दुकानात मिळतोय निकृष्ट गहू - तांदूळ

गुणवत्ता दुकानदारांनी आणि दक्षता समितीच्या सदस्यांनी तपासायला हवी होती.
ऐन दिवाळीत स्वस्त धान्य दुकानात मिळतोय निकृष्ट गहू - तांदूळ

पिंपरी : रेशन दुकानांमधून गरीब लाभार्थ्यांना काळवंडलेले निकृष्ट दर्जाचा गहू बारीक गहू वितरित केला जातो आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचेच तसे आदेश असल्याने दारिद्र्य रेषेखालील आणि प्राधान्यक्रमातील लाभार्थींना या महिन्यात असा काळवंडलेले गहूच खावा लागत आहे. गेली तीन महिने चांगला गहू वितरण करणाऱ्या सरकारने ऐन दिवाळीत गरिबांची चेष्टा करण्यासाठी निकृष्ट अन्नधान्य वितरित केले आहे काय? असा प्रश्‍न लाभार्थ्‍यांना सतावत आहे.

शहरातील दोन लाखाहून जास्त नागरिक रेशनिंगवर अवलंबून आहेत. सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत महाराष्ट्र शासनाकडून अंत्योदय, बीपीएल धारकांना दर महिन्याला ३५ किलो धान्याचा पुरवठा केला जातो. यात वीस किलो तांदूळ, पंधरा किलो गहू व एक किलो साखरेचा समावेश आहे. परंतु अधिकाऱ्यांनी रेशन दुकानात सडक्या गव्हाचा पुरवठा केला व दुकानदारास वाटप करण्यास दिला आहे. सरकारकडून कोरोना काळात गरिबांना मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती,

परंतु दोन महिने उलटूनही गरिबांच्या पदरात धान्य पडले नाही. दिलेली घोषणा ही हवेतच विरली असून गरिबांना हक्काचे चांगले धान्य देण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविल्या जात आहे, जे धान्य गुरेढोरे सुद्धा खात नाही. अन्नसुरक्षा कायदा(२०१३)नुसार रेशनवर पौष्टिक धान्य देण्याची सक्ती सरकारला केलेली आहे. तरीसुद्धा ऑक्टोबर महिन्याच्याशेवटी काही रास्त भाव धान्य दुकानांतून निकृष्ट दर्जाचा गहू व बेचव तांदूळ वितरित केला आहे. धान्य वितरित करण्याआधी त्याची गुणवत्ता दुकानदारांनी आणि दक्षता समितीच्या सदस्यांनी तपासायला हवी होती.

‘‘दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो बाहेरचे महाग गहू मिसळावे लागतात. गहू दळून आणल्यानंतर कणीक मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय पोळी खाण्यायोग्य होत नाही. शासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. आणि या दिवाळीच्या सणासाठी सरकारने गहू तांदूळ बदलून द्यावेत आणि तेल, साखर, चहा, रवा गोरगरिबांना मोफत वितरित करावे.’’

-सोनाली शिंदे, त्रिवेणी नगर, तळवडे लाभार्थी

‘‘अन्नधान्य वितरणधिकारी आणि राज्य सरकारच्या अन्नपुरवठा अधिकाऱ्यांनी रेशनवर वितरित केलेला गहू तांदूळ शिजवून खावा आणि नंतरच तो गरिबांना वितरित करावा. शहरातील अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना माहीत नाही काय? त्यांनी किडे वाळवणारा गहू परत घ्यावा.’’

-सारीका जाधव, चिखली प्राधिकरण

‘ज्या दुकानांमधून निकृष्ट बारीक गहू तांदळाचे वाटप झालेले आहे, अशा लाभार्थ्यांची आमच्याकडे तक्रार करावी. त्यांना धान्‍य बदलून देण्यात येईल. संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.’’

-दिनेश तावरे, ‘अ’ अन्नधान्य वितरण अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com