ना फराळ, ना दिवाळी पहाट!

वाहक चालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो
दिवाळी फराळ
दिवाळी फराळsakal

पिंपरी : दरवर्षी मुक्कामी असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘दिवाळी फराळ’ हा उपक्रम राबविण्यात येतो. मात्र यावर्षी ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाची परिस्थिती बिकट असल्यामुळे उपक्रमात खंड पडला आहे. परिणामी, यंदाच्या दिवाळीत वाहनचालकांनी सुगंधित उटण्याच्या अभ्यंगस्नान व फराळापासून वंचित राहावे लागले आहे. ना फराळ, ना दिवाळी पहाट! अशीच अवस्था एसटीच्या कर्मचाऱ्यांची पहायला मिळत आहे.

वल्लभनगर आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र मिळुन जमा केलेल्या रकमेतून आगारात मुक्कामी असलेल्या वाहन चालक- वाहकांना ‘दिवाळी पहाट’ साजरी करण्याची संधी दिली जाते. ंयाअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना उटणे, साबण, सुगंधित तेल व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या उपक्रम राबविला जातो. कामानिमित्त घरी दिवाळी साजरी न करता येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळतो. तसेच दिवाळी पहाट व गोडधोड फराळामुळे कर्मचाऱ्यांच्या मनावरील सणासुदीच्या कामाचा ताण काहीसा हलका होत असे, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असायचे.

सध्या वल्लभनगर आगारात राज्यभरातील आगारांमधील एकूण ८० बस उभ्या आहेत. या बसचे सुमारे २५० -३०० कर्मचारी आगारात मुक्कामी आहेत. ऐन दिवाळीत कामावर असल्याने कुटुंबियासमवेत दिवाळी साजरी करता येत नाही. तसेच वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने देखील फराळ वाटपाचा उपक्रम राबविला न गेल्याने, या दिवाळीला एसटी कर्मचाऱ्यांच्या असंतोषात आणखी भर पडली आहे. दिवाळी फराळ तर सोडाच, मात्र दैनंदिन आहारासाठी देखील या कर्मचाऱ्यांना झगडावे लागत असल्याची आगारातील स्थिती आहे.

अशी अवस्था का?

रातपाळीवर असणाऱ्या चालक वाहकाला त्याच दुर्गंधीयुक्त गाडीत झोपावे लागते. एखादी सामान्य व्यक्ती प्रवासात असते तेव्हा तो सुखरुप पोहचेपर्यंत त्याला त्याच्या घरुन फोनकॉल सुरु असतात, पण वाहक चालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो हे कोणालाही जाणवत नाही. जीवाची हमी घेण्यासाठी प्रवाशांना अपघातविमा किंवा अपघातग्रस्तांना लागलीच सरकारकडून आर्थिक मदत मिळते पण, त्याच बसमधले चालक वाहक मात्र अधांतरीच राहतात. त्यांना एसटी महामंडळाकडून ना कुठला विमा मिळतो ना कुठली भरपाई. राज्यसरकारच्या अंतर्गत असलेल्या एसटी महामंडळाची इतकी वाईट अवस्था का? असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

‘कोरोनामुळे एकूणच सगळ्याच कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्यामुळे वर्गणी जमा झाली नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीत दिल्या जाणाऱ्या ‘दिवाळी फराळा’च्या उपक्रमात यंदा खंड पडला आहे. ’’

-गोविंद जाधव, आगारप्रमुख वल्लभनगर आगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com