पिंपरी-चिंचवड : समन्याय ‘वाटपा’तून संतुष्टतेचे राजकारण 

पिंपरी-चिंचवड : समन्याय ‘वाटपा’तून संतुष्टतेचे राजकारण 

महापौर असो की उपमहापौर, स्थायी असो की कोणतीही विषय समिती आणि पक्षनेता असो की गटनेता. अशा पदांसाठी जवळपास सर्वच जण इच्छुक असतात. आणि त्यात गैर काहीच नाही. पण, पदे देताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागते. काहींना लगेच पद दिलं जातं. अर्थात यात ‘मर्जी’ही महत्त्वाची ठरते. मात्र, कोणी ‘आताच पाहिजे’ अशी भूमिका घेऊन ऐकतच नसेल तर, त्याला तसचं लटकवत ठेवण्याची खेळी वरिष्ठ खेळत असतात. पण, दिलेले शब्द पाळण्यासाठी जागा करावी लागते. यासाठी काहींचे मुदतीपूर्वीच राजीनामे घेऊन इतरांना पदावर बसवले जाते. काही वेळा मनासारखे पद मिळाले नाही म्हणून नाराजीतून राजीनामा नाट्यही घडते. याच स्थितीतून सध्या शहराचे राजकारणात फिरत असल्याचे गेल्या चार-पाच महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवरून दिसते. 

तारीख १४ ऑक्टोबर. तुषार हिंगे यांचा सत्ताधारी भाजपने तडकाफडकी राजीनामा घेतला होता. पक्षाच्या प्रदेश पातळीवरील वरिष्ठांनी राजीनामा घेतल्याचे सांगितले गेले होते. त्यांच्या रिक्त जागेसाठी सहा नोव्हेंबर रोजी निवडणूक झाली. केशव घोळवे यांच्याकडे उपमहापौरपदाची सुत्रे आली. मात्र, चार महिन्यातच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी महापौरांनी मंजूर करून आयुक्तांकडे पाठवला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे घोळवे यांनी सांगितले. पण, योगायोग असा की, त्यांनी राजीनामा देण्याच्या पाच तास अगोदर महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. त्यावरून भाजपमध्ये राजीनामा नाट्य रंगले आहे. हे नाट्य घडल्याबाबतच्या ‘राजकारणा’ची चर्चा रंगत असतानाच घोळवे यांच्या राजीनाम्याचा ‘बॉम्ब पडला. आणि त्यांनी राजीनामा दिला नसून पक्षाने घेतल्याच्या चर्चेला उधाण आले. इतकेच नव्हे तर, त्या रिक्त जागेवर मोशीतील नगरसेवक वसंत बोराटे यांची वर्णी लागणार अशीही बातमी बाहेर पडली. त्यात सत्यताही दिसून आली. कारण, घोळवे यांच्या निवडणुकीच्या वेळीच बोराटे यांचे नाव चर्चेत होते. आणि तेव्हाच ‘चार महिन्यांनी तुम्हाला पद दिले जाईल,’ असा शब्द त्यांना दिला होता, या चर्चेला उजाळणी मिळाली. ‘तो’ शब्द पाळण्यासाठीच राजीनामा नाट्य रंगले की काय? याची प्रचिती आगामी काही दिवसात येईल. असे, दिलेले शब्द पाळण्यासाठी व गेल्या चार वर्षात ज्यांना कोणतेही पद मिळाले नाही, त्यांना संतुष्ट करण्यासाठी आगामी काळात विषय समित्यांमधील काही सदस्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. असे घडल्यास आश्‍चर्य वाटायला नको. 

प्रतिष्ठेसाठी हवे पद 
स्थानिक कारभार पाहण्यासाठी महापालिका असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगर ठरते. अन्यथा अनेक गावांचा हा गोतावळाच आहे. अनेक राजकीय घराणे एकमेकांचे नातेवाईक आहेत. रोजगाराच्या निमित्ताने बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे अन्य शहरांच्या तुलनेत इथे राजकीय प्रतिष्ठा मोठी ठरते. महापालिकेत एखादी पद मिळालं की, प्रशस्त दालन मिळते. प्रशासनाकडून गाडी मिळते. गाडीवर पदाचा उल्लेख असलेला फलक असतो. सोबत चालक मिळतो. कार्यालयात प्रशासनाकडूनच सेवक वर्ग मिळतो. लग्नकार्य अथवा अन्य कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पदासह नामोल्लेख होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पदाचा कालावधी संपल्यानंतरही नावासोबत ‘माजी’ हा ‘पद’ व्यक्त करणारा शब्द कायमस्वरुपी जोडला जातो. अर्थात ‘पत’ आणि ‘पद’ यासाठीच हा सारा खटाटोप चालल्याचे स्पष्ट होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com