शिक्षण विभागाकडून परिपत्रकांचा मारा 
बदली प्रक्रिया रखडली ः अनेक वर्षांपासून एकाच शाळेत शिक्षकांची मक्तेदारी

शिक्षण विभागाकडून परिपत्रकांचा मारा बदली प्रक्रिया रखडली ः अनेक वर्षांपासून एकाच शाळेत शिक्षकांची मक्तेदारी

पिंपरी, ता. १८ ः प्राथमिक शिक्षक नियतकालिक बदल्यांबाबत शिक्षण विभागांकडून केवळ परिपत्रके काढले जातात. अर्ज मागविले जातात. पण त्यावरती काहीच कार्यवाही केली जात नाही. परिणामी, बदलीसाठी इच्छुक असून, प्रशासकीय बदल्या होत नाहीत. त्यामुळे प्रामाणिक शिक्षकांना काम करूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षे एकाच शाळेत ठाण मांडून असलेल्या शिक्षकांची मक्तेदारी वाढत आहे. त्याचा परिणाम शाळेच्या गुणवत्ता वाढीवर होत असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेतील प्राथमिक शिक्षक उपशिक्षक, पदवीधर, मुख्‍याध्यापक यांच्या बदल्यांबाबत सर्वंकष धोरण निश्‍चित करण्याबाबत दिलेल्‍या निर्देशानुसार महापालिकेतील शिक्षकांच्या बदल्यांबाबत १३ फेब्रुवारीनंतर पुन्हा ९ मार्च २०२३ रोजी परिपत्रक काढले आहे. यापूर्वी ८ मार्च २०२२ मध्ये एका परिपत्रकातील सूचनांनुसार चालू वर्षाकरता (सन २०२२) नियतकालिक बदल्यांच्या संदर्भात पर्यवेक्षक त्यांच्या नियंत्रणाखाली महापालिका प्राथमिक विभागातील जे शिक्षक, मुख्याध्यापक एप्रिल व मे महिन्यात बदलीस पात्र ठरतात. त्यांची यादी तसेच ज्या शिक्षक, मुख्याध्यापक वैयक्तिक किंवा वैद्यकीय कारणास्तव बदलीबाबतचे अर्ज देण्याचे आवाहन केले होते. अनेक शिक्षकांनी विभागीय पर्यवेक्षकांमार्फत शिक्षण प्राथमिक विभागाकडे आवश्‍यक त्या कागदपत्रांसह दिली होती. मात्र, एक वर्षाच्या कालावधीनंतर शिक्षकांचे अर्ज तसेच पडून आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आता पुन्हा शिक्षकांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले आहे. याबाबत पुन्हा प्राथमिक शिक्षण विभागाचे संदीप खोत यांनी परिपत्रक काढले आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत कागदपत्रांसह अर्ज करण्यास सांगितले आहे. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्‍याचे सूचित केले आहे. तसेच मुख्याध्यापकांनी शिक्षकांचा अर्ज शिक्षण विभागात पाठवला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

शिक्षक संघटनांच्या बदल्या लगेच ?
शिक्षण विभाग प्रशासन दरवर्षी बदल्या करण्यासाठी उदासीन असते. तसेच प्रशासन बदल्या जर करत असेल तर संघटनांकडून पैसे घेऊन बदल्या केल्या जातात? असा आरोप होतो. संघटना विरोध करतात म्हणून शिक्षण विभाग त्या शिक्षकांच्या बदल्या करत नाही. मुळात संघटनांच्या शिक्षकांना सोयीच्या शाळा आहेत, जे वर्षानुवर्षी त्या शाळेत आहेत. ज्यांना शाळा बदलायचे नाही, त्यांचे फावते व ज्या शिक्षकांना नेमक्या अडचणी आहेत. त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. येण्या- जाण्याची अडचण, कौटुंबिक अडचण, गैरसोय, वैद्यकीय अशा अडचणी आहेत. अशा शिक्षकांच्या अपेक्षांवर विरजण पडते. बदलीसाठी इच्छुक असून प्रशासकीय बदल्या होत नाहीत व नेहमीच शिक्षकानं काम करूनही अडचणींना सामोरे जावे लागते. याउलट वर्षानुवर्षी एकाच जागी असणाऱ्या शिक्षकांचा शाळेत मनमानी कारभार चालतो. शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षक नियतकालिक बदल्यांबाबत नुसतेच परिपत्रके काढले जातात. अर्ज मागविले जातात. पण त्यावरती काहीच कार्यवाही केली जात नसल्याचा अनुभव शिक्षकांनी सांगितला.


कोट
प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या नियतकालिक बदल्यांबाबत परिपत्रक काढलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी अर्ज केलेले आहेत. पण मी दीड महिना इलेक्शन ड्युटीवर असल्यामुळे टपालांवर काम करता आले नाही. आता नियमित रुजू झाल्याने शिक्षकांचे प्रस्ताव तयार करण्यास घेतले आहेत.
- प्रकाश सदाफुले, लिपिक, प्राथमिक शिक्षण विभाग

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com