Anemia Disease : युवकांमध्ये वाढतेय ॲनिमियाचे प्रमाण

गेल्या काही वर्षांत साधारणतः १४ ते २५ वर्षे वयोगटातील बहुतांश युवक ॲनिमियाचा सामना करत आहेत.
anemia disease
anemia diseasesakal

पिंपरी - बदललेल्या जीवनशैलीमुळे युवकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येत आहे. गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये ही समस्या वाढत असून, साधारणतः १४ ते २५ वर्षे वयोगटातील बहुतांश युवक ॲनिमियाचा सामना करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. हिमोग्लोबिन कमतरतेचा थेट परिणाम रोगप्रतिकारक क्षमतेवर होत असतो. त्यामुळे भविष्यात आरोग्यविषयक अनेक तक्रारी उद्‍भवू शकतात.

चुकीचा आहार

महाविद्यालयात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांना अनेकदा बाहेरगावी राहावे लागते. अशा वेळी त्यांना जेवण्यासाठी खाणावळीचा पर्याय स्वीकारावा लागतो. या वयात शरीराला आवश्‍यक ती पोषणमूल्ये या जेवणातून मिळत नाहीत.

घराबाहेर पडलेल्या युवकांमध्ये जंक फूड खाण्याची क्रेझ निर्माण होत आहे. त्यामुळे युवकांमध्ये चुकीच्या आहाराच्या सवयी हे एक प्रमुख कारण आहे. याविरुद्ध अनेक युवक-युवती समाजमाध्यमांवरील रिल्स किंवा व्हिडिओ पाहून डाएटिंगच्या नावाखाली चुकीचा आहार घेतात. डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केला जाणारा डाएटही आरोग्यास घातक ठरत आहे.

जेन झीमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता अधिक

दरम्यान, २००० नंतर ज्यांचा जन्म झाला, त्यांना तरुणाईच्या भाषेत ‘जेन झी’ असे संबोधले जाते. या वयोगटात सध्या हिमोग्लोबिनची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येत आहे. अकरावी-बारावीनंतर वाढलेली तीव्र स्पर्धा, आवडीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी करावी लागणारी तयारी, पूर्व परीक्षांचा अभ्यास, अशा तणावामधून हा वर्ग सध्या जात आहे.

अभ्यासामुळे करावे लागणारे जागरण, समाजमाध्यमांचा अतिवापर, व्यायाम व योग्य दिनचर्येचा अभाव ही देखील यामागची कारणे आहेत.

भविष्यातील आरोग्यावर प्रश्‍नचिन्ह

सध्या युवकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजाराचा संसर्ग होणे, लगेच थकवा येणे, हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी आजार अशा आरोग्याच्या तक्रारी उद्‍भवू शकतात. त्यामुळे पुढील पिढीला आरोग्यदायी बनवायचे असेल तर त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे डॉ. राम राऊत यांनी सांगितले.

‘शहरातील शिक्षणाच्या संधींमुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे पण शिक्षणासाठी बाहेर पडलेला आपला पाल्य योग्य आहार घेतोय का? याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. लवकर झोपा, लवकर उठा हा आरोग्यमंत्र युवकांनी पाळला पाहिजे. जंक फूड ऐवजी आपला पारंपरिक आहार घेतला पाहिजे.’

- डॉ. राम राऊत, एमडी, मेडिसीन

कारणे काय

- जंक फूडचे अतिसेवन

- बदललेली जीवनशैली

- स्पर्धेचा व अभ्यासाचा तणाव

- उशिरापर्यंत जागरण

- सोशल मीडियाचा अतिवापर

- अशास्त्रीय पद्धतीने केलेले डाएट

हे करावे

- सकाळी लवकर उठावे

- रात्री लवकर झोपावे

- फळे, कडधान्य, पालेभाज्या, अंडी यांचे सेवन करावे

- वेळेवर जेवण करावे

- नियमित व्यायाम करावा

- कमीत कमी चाळीस मिनिटे चालावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com