-अश्विनी देशकर
शर्टाखाली फाटलेली बनियन आणि त्याखाली पोटाची शांत भूक लपवणारा तो बाप... मी रडलो तर घर खचेल, या भितीने मनातल्या भावना व्यक्त न करणारा तो बाप... आयुष्यभर मुलांसाठी संघर्ष करणारा तो माणूस म्हणजे बाप. जर कुणी निस्वार्थ भावाने आपल्याला रागवत असेल तर ते आपले वडील. जगात पुरुष कुठल्यातरी स्वार्थाने आपल्या भोवती असतात. पण वडीलच एक असे असतात ज्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो.
आई विषयी सगळेच बोलतात, पण बाबांविषयी नाही. खरे तर एक दिवस नव्हे तर प्रत्येक दिवस बाबांसाठी असायला हवा. त्यांच्या कष्टांचा, त्यागाचा, त्या अबोल प्रेमाचा सन्मान रोज व्हायला हवा. मी आज मोठी अभिनेत्री आहे. पण बाबा हे पाहायला या जगात नाहीत. काही वर्षांपूर्वी बाबा गळ्याचा कॅन्सर या आजाराने गेले. आणि नुकताच आई सुद्धा मला सोडून गेली. त्यामुळे आयुष्य रिकामं वाटतं. बाबा गेलेत पण जाताना अनेक गोष्टी त्यांना बोलायच्या राहिल्यात. बाबांना मिठी मारून प्रेम व्यक्त करायचे राहिले. त्यांना 'आय लव्ह यू बाबा' म्हणायला उशीर झाला.
गळ्याचा कॅन्सर असल्याने बाबांना बोलता यायचे नाही. शेवटच्या दिवशी बाबांनी हात हलवून ‘मी जातो’ असं सांगितलं. मला वाटलं त्यांची बाहेर जायची इच्छा आहे. पण त्या शब्दांमध्ये त्यांचा कायमचा निरोप दडलेला होता. संध्याकाळी खोलीत गेले, तेव्हा बाबा गेले होते. खरं तर बाबांनी आधीच माझा निरोप घेतला होता. पण तो समजायला मला उशीर झाला. बाबांची ती शेवटची नजर आणि न बोलताही मनातून दिलेली हाक काय स्मरणात राहील. बाबा नेहमी म्हणायचे, 'बेटा, तू माझी स्पायडरमॅन... सुपरमॅन आहेस… बेटा, मला या कॅन्सरमधून वाचव ना रे...' मी रडायचे. पण मी बाबांना वाचवू शकले नाही.
माझ्या अभिनयाच्या प्रवासात बाबांचा खूप मोठा पाठिंबा होता. अपघातानंतर आई मुंबईला माझ्यासोबत होती, आणि बाबा नागपूरला घर, भाऊ, संसार सांभाळत होते. माझ्या स्वप्नात त्यांनी स्वतःचं आयुष्य गुंफलं. लोक म्हणायचे, ‘मुलगी माधुरी होणार का?’ पण बाबा नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे. नागपूरच्या ज्या सिनेमाघरात त्यांनी मॅनेजर म्हणून नोकरी केली, त्याच पडद्यावर माझा चंद्रमुखी व तेरवं हा चित्रपट झळकला... पण तो क्षण, माझे यश, हे सारे काही बघण्यासाठी बाबा या जगात नव्हते. त्यामुळे हे यश अपूर्ण वाटतं.
आपण जेव्हा यशस्वी असतो, तेव्हा वडील हे आपल्यावर भावनिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्टीने अवलंबून असतात. पण बाबा कधीच हे शब्दांत व्यक्त करत नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर स्वतः कमावलेलं असतं, कष्टाने आयुष्य घडवलेलं असतं. त्यांनी कधी कुणासमोर हात पसरलेले नसतो. पण निवृत्तीनंतर परिस्थिती बदलते. अशा वेळी मुलांनी त्यांच्या खिशात नकळत पैसे टाकायला हवे. बाबांचा हात आयुष्यभर देणारा राहिलेला असतो आता त्यांचं काही घेणं, त्यांना लाजिरवाणं वाटू नये, ही काळजी आपण घेतली पाहिजे.
आई-वडिलांचे आरोग्य हे आपलं सर्वात मोठं वैभव आहे. त्यांच्यासाठी आरोग्यविमा घ्या. दर महिन्याला त्यांचे हेल्थ चेकअप करून घ्या. कारण त्यांनी आपलं आयुष्य उभं केलंय, आता त्यांचं आयुष्य सजवण्याची जबाबदारी आपली आहे. मी माझा बाप गमावला आहे… पण तुम्ही गमवू नका. त्यांना रोज थोडा वेळ द्या. त्यांच्याशी बोला... कारण त्यांच्या या वयात त्यांना फक्त आपल्या मुलांचा वेळ, आपुलकी आणि संवाद हवा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.