Lok Sabha Elections 2024: लोकशाच्या उत्सवांतर्गत उद्या सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मतदान होणार आहे. मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार असला तरी तो बजावणे ही एक जबाबदारी आहे. त्या पार्श्वभूमीवर मी उद्या सोमवारी मतदान करणार आहे, तुम्हीही आवर्जून मतदान करा असे आवाहन सेलिब्रिटींनी मतदारांना केले आहे. आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. त्यामुळे ती संधी गमावू नका असेही अनेकांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान उद्या सोमवार 20 मे रोजी होणार आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच मतदारांना सहजपणे मतदान करता यावे म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सुट्टी दिली आहे. मात्र वीकेंडची शनिवारी-रविवारीची सुट्टी आणि त्याला जोडून मतदानाची सुट्टी आल्याने अनेकांनी पिकनिक प्लॅन केल्या आहे. त्यामुळे आधी मतदान मग पिकनिक किंवा इतर कामे असे म्हणत सेलिब्रिटींनी सर्वसामान्य मतदारांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवा म्हणून आयोगाने वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील मतदानाची टक्केवारी वाढावी, जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचे हक्क बजवावा म्हणून सेलिब्रिटीनी आवाहन करावा, त्यांनीही मतदानाचा हक्क बजवावा याकरिता मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तब्बल पकब हजार सेलिब्रिटी आणि उद्योजकांना पत्र पाठवली होती. त्याला संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद देत मी मतदान करणार आहे, तुम्हीही मतदान करा असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. त्यामुळे मुंबईतील मतदानाचा टक्का वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मी सोमवारी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्हीही एक जबाबदार नागरिक म्हणून आणि चांगल्या लोकांच्या हाती देश देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा", असं शाहरूख खान म्हणाला. तर सलमान खाननं देखील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला, "मी वर्षाचे ३६५ दिवस काम करतो, पण उद्या सोमवारी मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जाणार आहे. तुम्हाला कोणाला मत द्यायचे असेल त्याला द्या, पण मतदान करा. भारत माता की जय!"
"मी भारत आहे, भारत माझ्यात आहे. मी ताकद आहे, माझ्यात ताकद आहे. लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. मी मतदान करणार, तुम्हीही करा", असं ऋतिक रोशन म्हणाला.
तर शिल्पा शेट्टी म्हणाली, "मतदान करणे हा तुमचा हक्क आहे, त्यामुळे प्रत्येक मुंबईकर मतदारांनी मतदान करण्याचा आपला हक्क बजवावा. लोकशाही मजबूत करावी.". वरुण सोबती,सोनाली कुलकर्णी, पलश दत्ता,किरण राव, डॉली ठाकोर, मानसी साळवी आणि रतन टाटा यांनी देखील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.