Nandesh Umap : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या रंगात आलीये. फक्त राजकीय नेतेचं नाहीत तर विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप (Nandesh Umap) हे सुद्धा यंदा लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत.
ईशान्य मुंबईतून नंदेश यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने नंदेश उमप निवडणुकीला उभे राहिले आहेत.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात नंदेश उमप यांच्यासमोर महायुतीचे मिहिर कोटेजा आणि महाविकास आघाडीचे संजय पाटील यांचं आव्हान असणार आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नंदेश उमप यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजकार्यासाठी आपण ही काहीतरी केलं पाहिजे. या रिंगणात उतरले पाहिजे. कलाकार म्हणून नेहमीच प्रबोधन करत असतो. आता वेगळी इनिंग आपण खेळली पाहिजे, याच हेतून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"आपल्या सामाजिक जीवनात अडचणी सगळ्यांना असतात. सगळ्या गोष्टी पुर्ण होत नाहीत. त्याचा पाठपुरावा आपल्याला करता येतो का? कलाकारांसाठी काही करता येईल का? कलाकारांचेही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी भांडता येईल का? याआधीच्या सरकारमध्ये मी सांस्कृतिक खात्यात काम करत होतो, त्यावेळीही मी हे करत होतो. त्यामुळे कलाकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे." असं नंदेश उमप यावेळी म्हणाले.
निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर नंदेश यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शनही घेतलं. त्यांच्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले,"नव्या इनिंगला सुरूवात झालीय. मनात खूप चांगली भावना आहे. गाणे तर चालू आहेच, पण ही इनिंग लढायला काय हरकत आहे. म्हणून लढतोय. माझा जन्मच विक्रोळीत झालाय. तिथे आमची आणि सगळ्याच जातीधर्माची माणसं आहेत जी मला लोक ओळखतात. बाबांनी तिथे काम केलं आहे. म्हणून, तेथून लढण्याचा निर्णय घेतला. बसपा (बहुजन समाजवादी पक्ष)कडून मला निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली. म्हणून, त्यांच्या वतीने लढण्याचा निर्णय घेतला. रसिकांनी माझ्या गाण्यावर प्रेम केलंय. ते मला इथंही साथ देतील असा मला विश्वास आहे."
कोण आहेत नंदेश उमप?
नंदेश उमप हे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय लोकशाहीर आणि गायक आहेत. ते सुप्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत. लोकसंगीताच्या क्षेत्रातील आघाडीचे कलाकार म्हणून नंदेश यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप (Vitthal Umap) यांनी त्यांच्या घराण्यात रुजवलेली लोकसंगीताची गायकी त्यांच्या पश्चात नंदेश यांनी सांभाळली. तर विठ्ठल उमप यांच्या निधनानंतर त्यांच्या गाजलेल्या जांभूळ आख्यानाची धुराही नंदेश यांनी समर्थपणे सांभाळली.
फक्त पोवाडा किंवा लोकसंगीतच नाही तर नंदेश यांनी गझल गायक म्हणूनही ओळख कमावली आहे. याशिवाय त्यांनी उडत्या चालीचीही गाणी गायली आहेत.
'कोक स्टुडिओ'मध्ये त्यांनी गायलेलं दार उघड बया असो किंवा सुंबरान मांडलं असो किंवा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' 'महाराजांची कीर्ती बेफाम' हा पोवाडा आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यांच्या गायकीसाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.