

Dhurandhar movie review
esakal
किशोर अर्जुन - kishor.opera@gmail.com
‘धुरंधर’ हा एक असा सिनेमा ठरला आहे, की जो तुम्हाला आवडू शकतो किंवा नावडू शकतो; पण तुम्ही त्याला ओलांडून, टाळून पुढे जाऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात झाकीर खानने ‘धुरंधर’ सिनेमाबद्दल एका सिने अवॉर्ड वितरण समारंभात केलेली एक टिप्पणीदेखील हेच अधोरेखित करते. साधारणतः २०२५ मधील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर’चा फर्स्ट लूक पाहण्यात आला होता. जवळपास एकही संवाद न देता, संपूर्णतः साउंड आणि अत्यंत वेगवान ॲक्शन यांची सांगड घालत प्रेक्षकांच्या भेटीला आलेला फर्स्ट लूक, त्यानंतर टीझर आणि पुढे ट्रेलरदेखील असाच एडिट करण्यात आला होता. त्या सगळ्याचा परिणाम असा झाला, की ॲक्शन-थ्रिलर आवडणाऱ्यांनी हे टीझर आणि ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. पुढे ‘इफ्फी’ २०२५च्या समारोप कार्यक्रमात रणवीर सिंगच्या रिषभ शेट्टीवरील वादग्रस्त टिप्पणीमुळे ‘धुरंधर’ प्रदर्शनाला आठवडा असताना नकारात्मरीत्या चर्चेत आला. त्यातच प्रदर्शनानंतर जवळपास पहिला आठवडाभर तर ‘चार तासांचा ‘प्रपोगंडा’ सिनेमा’ म्हणून प्रसिद्धी मिळाल्याने मुख्य प्रवाहातील समीक्षक, प्रेक्षक आणि कलाकार यांनी सुरुवातीला सिनेमावर व्यक्त होणे टाळलेच... पण त्यानंतर या सिनेमाला एकूणच मिळालेला प्रतिसाद, सोशल मीडियातून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी झालेली प्रसिद्धी अन् कुप्रसिद्धीमुळे दोन्ही गटांतील प्रेक्षकांनी चित्रपटगृहे ओसंडून जाऊ लागली. पुढे मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागाला तर ‘न भूतो...’ अशी प्रसिद्धी आणि प्रेक्षक लाभले. हे कसे झाले?
‘धुरंधर’चे यश कशात आहे; तर उत्तम स्टोरीटेलिंग. गेल्या काही वर्षांत देशात आणि जगभरातील सिनेमांची लांबी कमी कमी होत दीड ते दोन तास एवढी होत असताना आणि जोडीला रील्सच्या प्रभावामुळे प्रेक्षकांचा स्क्रीन अटेन्शन स्पॅन दोन-तीन सेकंदांवर आलेला असताना, आदित्य धर जवळपास प्रत्येकी चार तासांचे दोन सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचे स्वप्न बाळगतो आणि त्यात यशस्वीदेखील होतो. ‘धुरंधर’च्या दोन्ही भागांना भारतात मिळालेला उदंड प्रतिसाद हेच अधोरेखित करतो, की ‘तुम्ही पडद्यावर गोष्ट कशी सांगता हे प्रेक्षकांसाठी जास्त महत्त्वाचे आहे.’ कोणत्याही यशस्वी सिनेमासाठी आवश्यक असणारी प्रत्येक बाब ‘धुरंधर’मध्ये पुरेपूर आहे. नायकाचा भूतकाळ, त्याचे कुटुंबासाठी (आणि नंतर देशासाठी) पेटून उठणे, कुटुंबाच्या आणि पुढे देशाच्या दुश्मनांचा बीमोड करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणे... नायकापेक्षा खलनायक (किंवा परिस्थिती) प्रचंड मोठा असणे आणि तरीही विविध मार्गांनी, पद्धतीने सगळ्या अडचणींवर मात करत खलनायकावर विजय मिळवणे आणि समजा जेव्हा विजय दुरापास्त आहे तेव्हा येनकेनप्रकारे प्रेक्षकांची सहानुभूती सतत नायकासोबत ठेवण्यात या बाबी महत्त्वाच्या ठरतात. कथनशैलीमध्ये ‘अशा’ पद्धतीचा ‘नायकाचा प्रवास’ हा अत्यंत यशस्वी मानला जातो. दुसरीकडे ‘रणवीर’ने साकारलेले पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटण्याचे काम आदित्य धरपेक्षाही संदीप वांगा रेड्डीच्या ‘अर्जुन रेड्डी’ (हिंदी : कबीर सिंग), ‘ॲनिमल’ आणि प्रशांत नीलच्या ‘केजीएफ १ आणि २’ या सिनेमांमुळे झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सिनेमांमुळे नायक हा स्वतःच ‘नायक - न नायक आणि खलनायक’ यांच्या भूमिका करताना दिसू लागले.