

Babasaheb Ajarekar and Warkari Tradition
esakal
श्रीगुरू हरिदास रामभाऊ बोराटे (आजरेकर माउली)
वारकरी संप्रदायाची परंपरा ही केवळ आषाढी-कार्तिकी वारीपुरती मर्यादित नसून संतवाङ्मय, कीर्तन, नामस्मरण, सेवाभाव आणि सात्त्विक आचार यांवर उभारलेली एक अखंड जीवनपद्धती आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी घालून दिलेल्या भक्तिमार्गाचा वारसा पुढे नेण्यासाठी अनेक फड निर्माण झाले. या फडांमध्ये परंपरेची शुद्धता, ग्रंथाधिष्ठान, कीर्तनपरंपरा आणि सेवाभाव यांमुळे विशेष ओळख निर्माण करणारा फड म्हणजे आजरेकर फड होय. जवळपास दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या फडाने वारकरी संप्रदायात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
आजरेकर फडाचे संस्थापक श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर यांचे मूळ नाव दिनकरराव माईणकर. त्यांनी श्रीगुरू भाऊसाहेब बार्शीकर यांच्याकडून अनुग्रह घेतला. भाऊसाहेब बार्शीकर यांनी कीर्तन परंपरेतून संप्रदायाची जडणघडण केली होती. आपल्या अखेरच्या काळात त्यांनी ‘आमचे प्रतिपादन पुढे बाबासाहेब आजरेकर यांच्या मुखातून ऐकावयास मिळेल,’ असे उद्गार काढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बाबासाहेबांना कीर्तनपरंपरेत विशेष स्थान प्राप्त झाले.