

Amar Shaikh and Samyukta Maharashtra Movement
esakal
प्रा. गणेश चंदनशिवे
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास शाहिरांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या लढ्याला आपल्या पोवाड्यांनी आणि बुलंद आवाजाने जनआंदोलनाचे स्वरूप देणाऱ्या शाहीर अमर शेख यांचे स्थान त्यात अनन्यसाधारण आहे. समाजातील विषमता, शोषण आणि मराठी अस्मिता यांवर निर्भीड भाष्य करणाऱ्या अमर शेख यांच्या साहित्याचे आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त नव्याने स्मरण होणे आवश्यक आहे...
शाहीर अमर शेख, शाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर द. ना. गवाणकर यांनी साम्यवादी तत्त्वज्ञान शाहिरीद्वारे रुजवितानाच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उडी घेतली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा मराठी जनतेच्या अस्मितेचा हुंकार होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एकमेव अशी चळवळ आहे जिथे सारे पक्ष एकत्र येऊन, आपले मतभेद विसरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजुटीने लढले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विचारवंतांबरोबर शाहीरही अग्रणी होते. किंबहुना सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सामावून घेण्याचे महत्त्वाचे कार्य शाहिरांच्या पोवाड्यांनी केले. हे शाहीर केवळ शाहीर नव्हते; तर तत्कालीन राजकीय आणि सामाजिक स्थितीचे भाष्यकारही होते. ते या लढ्यातील बिनीचे शिलेदार होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड यांसारख्या नेत्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात शाहिरांनी जागल्याची भूमिका पार पाडली. ‘जाग मराठा आम जमाना बदलेगा’ अशी डरकाळी फोडणाऱ्या शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तेवत ठेवला. पोवाड्यांच्या, लोकगीतांच्या जोडीला अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर, माझी मुंबई, शेटजीचे इलेक्शन असे कितीतरी नवे तमाशे त्या काळात अमरकला पथकाच्या माध्यमातून सर्वत्र गाजत होते. त्यातलेच अग्रणी नाव म्हणजे, शाहीर अमर शेख होय.
जय महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या गाऊ गाना।
गाऊ उंचावूनी माना। घेऊ तानावर ताना।।