

Security Challenges in Jammu and Kashmir
esakal
गौरव बाळे
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचाराच्या घटनांनी पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः वार्षिक अमरनाथ यात्रेच्या काळात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अलिकडच्या काळात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे या भागातील सुरक्षेचे वातावरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांमधील अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकींचे प्रमाण वाढले आहे. गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्दबातल झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवादी भरतीमध्ये घट झाली असली, तरी जम्मू आणि पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अमरनाथ यात्रा ही केवळ धार्मिक महत्त्वाची नसून या प्रदेशातील धार्मिक सलोखा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या यात्रेला लक्ष्य करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.