

Cockroach Janata Party
esakal
राहुल गडपाले - saptrang@esakal.com
उपहासात्मक अशा ‘कॉक्रोच’ शब्दातून सुरू झालेली चळवळ आज देशातील शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धती, बेरोजगारी आणि संस्थांवरील विश्वास अशांसारख्या मूलभूत प्रश्नांना भिडली आहे. सोशल मीडियावर जन्माला आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणत व्यवस्थेतील त्रुटींविरुद्ध व्यापक जनआंदोलन उभे केले आहे. ही चळवळ क्षणिक ठरेल की नव्या राजकीय प्रवाहाची नांदी बनेल, याचे उत्तर भविष्यात दडले असले तरी तिने भारतीय तरुणाईच्या मनातील अस्वस्थतेला दिलेला आवाज दुर्लक्षित करता येणार नाही.
देशाचा राष्ट्रध्वज खांद्यावर मिरवत, अंगावर लाठ्या-काठ्यांचा मार सहन करत, ‘इन्कलाब झिंदाबाद’चे नारे देत देशभरातील लाखो विद्यार्थी आज रस्त्यांवर उतरले आहेत. राजधानीच्या जंतर-मंतर परिसरात तब्बल तीस दिवसांपेक्षा अधिक काळ हे विद्यार्थी धरणे आंदोलन करत आहेत. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोज वाढते आहे. कधी त्यांच्यावर लाठीचार्ज होतो, कधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, तर कधी वीज आणि पाणी कापले जाते. तरीही ते जागचे हलायला तयार नाहीत. देशातील या तरुणांची मागणी काय, तर एक पारदर्शी शिक्षण व्यवस्था. मात्र त्यासाठीसुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतोय. स्वतः विश्वगुरू असल्याची बतावणी करणाऱ्या देशावर अशी वेळ का यावी, याचा आता साकल्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय देशातील तरुण बंडखोरीचा मार्ग अवलंबत असल्यास समाज म्हणून त्यांच्या गरजा समजून घेण्यात आपण कमी पडतो आहोत, हे सर्वात आधी आपण समजून घ्यायला हवे.
एका सरन्यायाधीशांनी केलेल्या टिपण्णीवरुन सुरू झालेले हे उपहासात्मक आंदोलन आता एका जनचळवळीत रूपांतरित झाले आहे. या आंदोलनाची मागणी शिक्षण व्यवस्थेचा कमकुवतपणा अधोरेखित करणारी असली, तरीदेखील प्रत्यक्षात या आंदोलनाचा सूर मात्र आपली राष्ट्रनिर्माणाची बैठक अपरिपक्व असल्याचे सूचित करतो. देशातील तरुणांचा असंतोष आता केवळ शिक्षण व्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो देशातील राज्यव्यवस्थेच्या चुकाच चिन्हांकित करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे वरकरणी जरी हे तरुणांचे आंदोलन वाटत असले तरी याचा देशाच्या एकूणच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सारिपाटावर होणारा परिणाम गंभीर असणार आहे. त्यामुळे या आंदोलनाची समीक्षा करताना त्याच्या सर्व बाजू समजावून घ्यायला हव्यात.