

Crowd Control
esakal
ज्युलिओ रिबेरो - sakal.avtaran@gmail.com
जमाव नियंत्रण म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम नसून, संयम, निर्णयक्षमता आणि नेतृत्वाची कसोटी पाहणारे आव्हान असते. राजकीय दबाव आणि प्रतिकूल परिस्थितीतही कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवताना पोलिस अधिकाऱ्यांना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागतात. अशा संकटाच्या क्षणीच अधिकाऱ्याच्या विवेकबुद्धी, संयम आणि नेतृत्वगुणांची खरी परीक्षा होत असते.
नुकत्याच दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारीच्या घटनेची देशभरात मोठी चर्चा झाली. आंदोलनादरम्यान निदर्शकांना पांगवताना एका विद्यार्थ्याला कथितरीत्या पॅलेट लागल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सीजेपीने केली आहे. त्याला केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला असून, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असंख्य वेळा जमावाला सामोरा गेलो आहे. माउंट अबूमधील प्रशिक्षणानंतरच्या सुरुवातीच्या काळापासूनच एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली, की जमावाला स्वतःचे एक वेगळे, अस्थिर आणि सामूहिक व्यक्तिमत्त्व असते. साहजिकच जमाव नियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे केवळ तो पांगवणे नसून, त्या सामूहिक मानसिकतेचा प्रभाव कमी करून प्रत्येक व्यक्तीला पुन्हा स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करणे. ते साध्य करण्यासाठी प्रसंगी बळाचा वापर करणे अपरिहार्य ठरते. मात्र प्रत्येक वेळी बळाचा वापर हाच एकमेव उपाय असतो, असे नाही. मुंबईत अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) म्हणून कार्यरत असताना मी एकदा कोणत्याही बळाचा वापर न करता संतप्त जमावाला शांतपणे पांगवण्यात यश मिळवले होते. ती घटना होती मालाडमधली... क्रिकेट खेळताना दोन मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान एका अप्रिय घटनेत झाले. वादाच्या भरात एका मुलाने दुसऱ्याच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने प्रहार केला. त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. आरोपी बेकायदा जुगार अड्डा चालवणाऱ्या एका व्यक्तीचा मुलगा होता. साहजिकच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिक आणि युवकांनी मालाड पोलिस ठाण्यासमोर पश्चिम द्रुतगती महामार्गावर धरणे आंदोलन केले. महत्त्वाचा असा मुंबई-अहमदाबाद मार्ग त्यांनी पूर्णपणे रोखून धरल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.