

History of AI Alan Turing John McCarthy
esakal
डॉ. आनंद कुलकर्णी
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) ही आजच्या युगातील सर्वांत प्रभावी आणि वेगाने विकसित होणारी तंत्रज्ञानक्रांती ठरली आहे. चॅटजीपीटी, जेमिनाय, परप्लेक्सिटी यांसारख्या ‘एआय’ साधनांचा वापर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला असतानाच अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड’सारख्या प्रगत प्रणालींनी जागतिक सॉफ्टवेअर उद्योगासमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘एआय’मधील ताज्या घडामोडी, त्याचा भारतीय आयटी उद्योग व अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार भूषण ओक यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही मुलाखत.
प्रश्न : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘एआय’चा उगम खूप आधी म्हणजे १९५२ मध्ये ॲलन ट्युरिंग यांच्या शोधनिबंधातून झाला आणि १९५६ मध्ये अमेरिकेतील डार्टमाउथ परिषदेत जॉन मॅकार्थी यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) ही संज्ञा प्रथम प्रचारात आणली असे मानले जाते. असे असले तरी २०२२ मध्ये चॅटजीपीटी आल्यावर आणि अलीकडच्या अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड’च्या आगमनानंतर ही चर्चा खूप गाजते आहे. ‘एआय’च्या या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल?
डॉ. कुलकर्णी : ‘एआय’ची संकल्पना जुनी असली तरी तिचा व्यापक वापर अलीकडच्या काळात वाढला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात उपलब्ध डेटा आणि संगणकांची वाढलेली प्रक्रिया क्षमता. एआय इंजिनिअरिंग आणि एआय तंत्रज्ञान यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेमिनाय, चॅटजीपीटी किंवा क्लॉड ही एआय इंजिनिअरिंगची अंतिम उत्पादने आहेत. निसर्गात मानव आणि सर्व प्राणी, पक्षी आणि वृक्षवेलींचीही एक नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. जगण्यासाठी उत्तम साधने मिळवणे आणि त्यात उत्तरोत्तर गुणात्मक सुधारणा घडवणे आणि अनुभवातून शिकत जाणे यासाठी ही बुद्धिमत्ता वापरली जाते. निसर्गातील या बुद्धिमत्तेचा अभ्यास करून तिचे गणिती मॉडेल तयार करणे, त्याचे अल्गोरिदम बनवणे आणि त्यावर आधारित सॉफ्टवेअर विकसित करणे ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एआय इंजिनिअरिंग. भारतात अजूनही या मूलभूत स्तरावर कमी प्रमाणात काम होत आहे. आपण वापरतो ती तयार मिळालेली ‘एआय’ची सॉफ्टवेअर उत्पादने.
प्रश्न : अँथ्रोपिकचे ‘क्लॉड’ बाजारात आल्यावर सॉफ्टवेअर कंपन्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होतील, या भीतीने शेअर बाजारांमध्ये सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड पडझड झाली. ‘क्लॉड’मुळे सॉफ्टवेअर कंपन्यांना खरेच धोका आहे का?
डॉ. कुलकर्णी : ‘एआय’मध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत, जनरेटिव्ह आणि एजेंटिक. जनरेटिव्ह एआय हे कर्मचाऱ्यासारखे काम करते, तर एजेंटिक एआय व्यवस्थापकासारखे. एजेंटिक एआय प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी आणि सुधारणा स्वतः करू शकते. त्यामुळे मोठ्या टीमची गरज कमी होते. त्यामुळे एखाद्या कंपनीला एका प्रकल्पात आधी ५० अभियंते लागत असतील, तर आता फक्त १० किंवा अगदी दोन अभियंतेसुद्धा ते काम ‘क्लॉड’च्या साह्याने करू शकतील. यामुळे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार हे निश्चित आहे; पण त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे म्हणणे ही अतिशयोक्ती ठरेल.