

Kaagaz Ke Phool
eSakal
सामाजिक विषमता, बेरोजगारी, गुन्हेगारी- कधी संगीतमय प्रणयकथा अशा सिनेमांच्या गर्दीत ट्रिकसीन असलेले पौराणिक, देमार, कपोलकल्पित कथांचे चाहते असत. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची कारकीर्द सुरू झाली असताना त्यांना ‘ट्रिकसीन’चे बादशहा समजल्या जाणाऱ्या बाबूभाई मिस्त्री दिग्दर्शित ‘चंद्रसेना’ हा चित्रपट मिळाला. त्यात पं. मधुर, सरस्वतीकुमार दीपक, इंदीवर या कवींच्या मध्ये एक गाणं लिहायची संधी गुलशन ‘बावरा’ यांना मिळाली.
शेखपुरा पाकिस्तानकडून फाळणीच्या वेळी भारतात येताना त्यांच्या आई-वडिलांची हत्या झालेली त्यांनी समोर पाहिली होती. त्यांच्या छातीवर रायफलचे प्रहार झाले होते. बालमनावर आणि शरीरावर आघात झालेले गुलशन कित्येक वर्षे रुग्णालयात, निर्वासिताच्या छावणीत होते. मुंबईत आल्यावर सिनेमाकडे वळण्याआधी कर्नाक बंदरात गुडस क्लार्क म्हणून पावत्या फाडत होते. कल्याणजी भाईंच्या गायवाडीतल्या घरात येत-जात होते. गुलशन बावरा सांगतात, ‘‘चंद्रसेना’साठी एक गाणं लिहायची संधी चालून आली. ‘मैं क्या जानू काहे लोग ये सावन मतवाला रे’ लतादीदी गाणार होत्या. मी खुशीत होतो. २३ ऑगस्ट १९५८ हा दिवस मला आठवतो. चेंबूरचा बसंत स्टुडिओ. मी जामानिमा करून गेलो. बुशकोटवर टाय बांधली होती. गीताचे कवी म्हणून माझी ओळख करून दिली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. म्हणाल्या, ‘कविराज टायची गाठ सोडली तरी चालेल. किती उकडतंय ना!’ नंतर कल्याणजी भाईंशी मराठीत काहीतरी बोलल्या. बहुधा म्हणाल्या असतील, ‘काय ध्यान आहे! मी होतोच बावळा... म्हणून गुलशन बावरा...’