
Myanmar instability India
esakal
मधुबन पिंगळे
म्यानमारमध्ये लष्कराने २०२१मध्ये केलेल्या बंडानंतर परिस्थिती ढासळत आहे. हा देश आता गृहयुद्धामध्ये अडकला आहे. ईशान्य भारतातील चार महत्त्वाच्या राज्यांना लागून म्यानमारची सीमा आहे. त्यामुळे या चारही संवेदनशील राज्यांच्या स्थैर्याच्या दृष्टीने म्यानमारमधील घडामोडींकडे पाहणे गरजेचे आहे. त्याबरोबरच आग्नेय आशिया आणि चीन या दोन्ही दृष्टीनेही म्यानमारचे सामरिक महत्त्व भारताला विसरता येणार नाही.
ईशान्य भारतातील देशविरोधी घटक आणि शेजारी देशांमधील कमकुवत व्यवस्थेचा त्यांना होणारा फायदा हा विषय भारतासाठी कायम डोकेदुखीचा ठरला आहे. गेल्या तीन दशकांमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील अतिरेकी संघटनांचा उपद्रव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मणिपूर आणि नागालँडमधील परिस्थिती चिंताजनक होत आहे.