India crude oil self-reliance
Esakal
पल्लवी यादव, तेल आणि वायू क्षेत्राच्या तज्ज्ञ
सागरी राजकारणाच्या कठोर वास्तवात, सहकार्याचा आदर तेव्हाच केला जातो, जेव्हा संघर्षाचे प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्यदेखील तितकेच पक्के असते.
जा गतिक ऊर्जा सुरक्षा ही संसाधनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असली, तरी भौगोलिक सागरी स्थिती ही जागतिक भू-राजकारणाचे प्रमुख मर्मस्थान आहे. सागरी मार्गाने होणारा ६० टक्क्यांहून अधिक तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीचा ओघ हा होर्मुझ, मलाक्का, बाब-अल-मंदेब यांसारख्या काही महत्त्वाच्या सामुद्रधुनींवर अवलंबून आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा-साखळीची कार्यक्षमता पूर्णतः या सागरी मार्गिकांमधील टँकरच्या अबाधित दळणवळणावर आधारित असते.
या सागरी मार्गांचा वापर सामरिक मुत्सद्देगिरीचे एक साधन म्हणून केला जात आहे. म्हणजेच, या जलमार्गांवर नियंत्रण असणे हे ऊर्जा संसाधनांवर नियंत्रण असण्याइतकेच प्रभावी ठरते, हे लक्षात येत आहे. याच वर्षात हवामान बदलामुळे पनामा कालव्यातील जलपातळी खालावल्याने, जहाजांच्या मालवाहू क्षमतेवर आणि त्यांच्या वाहतुकीच्या फेऱ्यांवर मर्यादा आल्या. ही महत्त्वाची व्यापारवाहिनी विस्कळित झाल्याने, याचा परिणाम नैसर्गिक वायू (एल.एन.जी) आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर झाला. सामरिक सागरी मार्ग खंडित होतो, तेव्हा ऊर्जा पुरवठासाखळी केवळ मंदावत नाही, तर कोलमडून पडते. परिणामी, जागतिक ऊर्जा-समीकरण बिघडते. कच्च्या तेलाच्या तात्काळ उपलब्धसाठ्यात तूट निर्माण होते. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वधारतात. जोखीम वाढल्याने मोठ्या तेलवाहू जहाजांचे विमाहप्ते गगनाला भिडतात. हा सर्व आर्थिक बोजा या संपूर्ण मूल्यसाखळीत अखेर ग्राहकावर पडतो.