

Indian Stock Market
esakal
भूषण महाजन - kreatwealth@gmail.com
गेली दोन वर्षे भीती, युद्धजन्य तणाव, महागाई आणि व्याजदरवाढ यांच्या सावटाखाली दबलेला भारतीय शेअर बाजार आता पुन्हा उसळी घेण्याच्या तयारीत दिसत आहे. नकारात्मक बातम्यांचा मारा सुरू असतानाही निर्देशांक ठाम राहू लागले आहेत, काही क्षेत्रांत नवी तेजी आकार घेत आहे आणि गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. त्यामुळे बाजार जणू एकच संदेश देत आहे, ‘‘मी पुन्हा येईन...!’’
हाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘‘मी पुन्हा येईन...!’’ हे वक्तव्य मागे प्रचंड व्हायरल झाले होते. कितीही हेटाळणी झाली असली, तरी ‘मी पुन्हा येईन...’ हे वचन सत्यात उतरवले गेले आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दिमाखदारपणे विराजमान झाले. तसेच, गेली दोन वर्षे निरनिराळ्या कारणांनी हद्दपार झालेली भारतीय शेअर बाजारातील तेजी आता जणू म्हणते आहे, ‘‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...!’’
शेअर बाजारातील गंमत म्हणजे तेजी आली, की प्रत्येकजण हुशार अर्थतज्ज्ञ होतो आणि मंदी येताच त्याचे विचारवंतात रूपांतर होते. तेजी सुरू झाली, की आपण म्हणतो, ‘तेजीवाला बैल उधळला!’; पण हा बैल नेमका मधल्या काळात कुठे लपून बसला होता, ते बहुतेकांना कळत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो पुन्हा धावायला कधी लागतो? खरे तर बैल कधीच मरत नाही; तो फक्त दम खाऊन थांबतो. मंदीचे अस्वल थोडावेळ त्याच्यावर मात करते, इतकेच! मंदीवाल्यांचा पगडा बाजारावर काही काळ बसतो. कधीकधी तेजीचा अतिरेक
झाला असेल, तर जपानसारखे बाजार वीस-वीस वर्षे मंदीत जातात. गुंतवणूकदार घाबरतात, शेअर विकले जातात, टीव्हीवरील तज्ज्ञही निराशेचे सूर आळवू लागतात. ‘‘आता बाजारात काही दम नाही,’’ अशा चर्चेला व्हॉट्सॲप विद्यापीठात ऊत येतो; पण इतिहास सांगतो की ‘बुल रन’चा जन्म आशावादातून होत नाही; तो निराशेच्या गर्भातूनच होतो.