

Investing in People
esakal
सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com
गाव म्हणजे रोमॅन्टिक काहीतरी आहे, हा निव्वळ भ्रम आहे. भ्रमातून बाहेर या. भानावर या. कोकणात तुम्ही कोणत्याही जागी उभे राहा. त्या प्रत्येक जागी संधी प्रचंड आहे. कोकणातलं प्रत्येक झाड काहीतरी देतं; पण ते घेण्यासाठी आपली झोळी फाटकी तर नाही ना?
साल २००९. ‘रॉकेट सिंग’ सिनेमा आला होता. बी. कॉम. झालेला हरप्रीत सिंग बेदी या पंजाबी मुलाचा रोल रणबीर कपूरने केलाय. जयदीप सैनी यांनी लिहिलेल्या ‘रॉकेट सिंग’मध्ये शेवटी एक सीन आहे. सुनील पुरी एक रुपया देतो आणि हरप्रीतला त्याची कंपनी रिटर्न करतो. तेव्हा हरप्रीत त्याला खतरनाक उत्तर देतो... ‘बिझनेस म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही! बिझनेस म्हणजे लोकंच असतात’ असा डायलॉग ‘रॉकेट सिंग’च्या शेवटी आहे!
सगळ्यात जास्त रिटर्न्स कोणत्या इन्व्हेस्टमेन्टमधून मिळतात? कुणी सांगतं, गोल्डमध्ये गुंतव. कुणी सांगतं, एसआयपी कर. कुणी सांगतं, जागेत गुंतव. कुणी सांगतं, म्युच्युअल फंडमध्ये टाक. प्रत्येक जण आपापल्या अनुभवावरून वेगवेगळे सल्ले देत राहतो.
पण, कुणी माणसांमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतं का कधी? कुणीतरी कधीतरी हे सांगायला हवं. माझा गावी शिफ्ट होण्याचा बेसिक थॉट माणसांमधील इन्व्हेस्टमेन्ट वाढवणं, हाच होता. तो मला अधिक प्रभावीपणे समजला ‘सुगंध’ हा ब्रॅण्ड साकारणाऱ्या दिलीप आणि गौरी या दाम्पत्याकडून.